अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, राज्यात तणावपूर्ण शांतता

जम्मू काश्मिरात तणावपूर्ण शांतता आहे.

Updated: Aug 6, 2019, 12:26 PM IST
अजित डोवाल जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, राज्यात तणावपूर्ण शांतता title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा राखणारा अनुच्छेद ३७० आणि ३५ अ काढण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने राज्यसभेत संमत केल्यावर आता जम्मू काश्मिरात तणावपूर्ण शांतता आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा राज्यपालांनी आढावा घेतला आहे. शहरात आज सगळी दुकानं बंद आहेत. बाजार उघडलेला नाही. 

जागोजागी रस्त्यावर निमलष्करी दलांच्या तुकड्या तैनात आहेत. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. अनोळखी वाहनांची चौकशी केली जाते आहे. निमलष्करी दलांनी जागोजागी चौक्या उभारल्या आहेत. शहरात तुकळक वाहतूक सुरू आहे. पण अजूनही वातावरणात तणावपूर्ण शांतता आहे.

कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत सादर केला आहे. अमित शाह प्रस्ताव मांडत असताना सरकारनं रात्रीतून नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. यावेळी काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात या मुद्द्यावरुन जुंपल्याचं पहायला मिळाले. 

मोदी सरकारनं हस्तक्षेप करायला काश्मीर प्रकरण भारताचं अंतर्गत प्रकरण थोडंच आहे असं वादग्रस्त वक्तव्य करत काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी फसले. त्यावर संतप्त अमित शाहांनी पीओकेला आपण भारताचा हिस्सा मानत नाही का? असा सवाल काँग्रेसला केला. पीओकेसह जम्मू-काश्मीर भारताचा प्राण असून प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान असल्याचं यावेळी अमित शाह म्हणाले.