दिल्लीहून १२०० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणार

दिल्लीत युपीएससी करणाऱ्या, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रेल्वेने आणणार.

Updated: May 11, 2020, 04:46 PM IST
दिल्लीहून १२०० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणार title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक बंद आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक राज्यांत मजूर, विद्यार्थी मोठ्या संख्येने अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयं बंद असून परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी महाराष्ट्राबाहेर गेलेले अनेक विद्यार्थी विविध राज्यात अडकले आहेत. दिल्लीतही युपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेलेले अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. आता दिल्लीत युपीएससी करणाऱ्या, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन १६ मे रोजी रेल्वे महाराष्ट्राकडे निघणार असल्याची माहिती मिळत आहे. हे १२०० विद्यार्थी रेल्वेने येणार आहेत. दिल्ली ते पुणे किंवा मुंबईपर्यंत रेल्वे जाणार आहे.

यापूर्वी भुसावळपर्यंतच रेल्वे जाणार होती. मात्र आता विद्यार्थ्यांना मुंबई किंवा पुण्यापर्यंत नेण्यास सरकारने तयारी दर्शवली आहे. या विद्यार्थ्यांना बसेसने दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहचवले जाणार आहे. संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात घेऊन येण्यापूर्वी त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. निघण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना रेल्वेने पाठवण्यात येणार आहे.

एकूण १६०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२०० विद्यार्थी येणार आहेत. तर इतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात नेले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

...म्हणून आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा निर्णय बदलला- अनिल परब

दरम्यान, महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. एका दिवसात एसटीच्या माध्यमातून ८ हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडण्यात आलं. औरंगाबादच्या रेल्वे रुळ दुर्घटनेनंतर मजुरांबाबतची ही बाब मोठ्या प्रकर्षाने समोर आली. राज्य शासनाने यासाठी महत्वाची पाऊलं उचलत मजुरांना मोफत एसटी प्रवास देण्याची घोषणा केली. रस्त्याने पायपीट करत चाललेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसह सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात आलं.

 

'श्रमिक स्पेशल रेल्वे' सुविधेत मोठा बदल