'राज'च्या सेटवर बिपाशा बासू रडत होती अन् दिनो मौर्या...; विक्रम भट्ट यांनी 22 वर्षांनी केला खुलासा

बिपाशा बासू आणि दिनो मौर्या यांची ब्लाइंड डेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. 1996 ते 2002 दरम्यान दोघे एकमेकांना डेट करत होते.   

शिवराज यादव | Updated: Aug 8, 2024, 05:46 PM IST
'राज'च्या सेटवर बिपाशा बासू रडत होती अन् दिनो मौर्या...; विक्रम भट्ट यांनी 22 वर्षांनी केला खुलासा  title=

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि दिनो मौर्या (Dino Morea) ही जोडी 'राज' चित्रपटात पहिल्यांदा एकत्र झळकली होती. विक्रम भट्टने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 2002 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची गाणी आजही त्याच आवडीने ऐकली जातात. या चित्रपटाचं शुटिंग सुरु असतानाच बिपाशा आणि दिनो मौर्या यांचा ब्रेकअप झाला होता. विक्रम भट्टने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत या ब्रेकअपचा शुटिंगवर कसा परिणाम झाला होता याबद्दल सांगितलं आहे. 

"मला एक दुःखद परिस्थिती आठवते जेव्हा आम्ही त्यांच्या लग्नाच्या गाण्याचे शूटिंग करत होतो. 'मैं आगर सामने...या गाण्यात एक ओळ आहे. 'अपनी शादी के दिन अब नही दूर है'. या गाण्याच्या शुटिंगदरम्यान ते दोघे भांडत होते. मला आठवतं की बिपाशा रडत होती आणि दिनो दुःखी होता," अशी आठवण विक्रम भट्टने सांगितली.

विक्रम भट्टने त्यांना काय सांगितलं होतं?

त्याने पुढे सांगितलं की, "मी त्यांना म्हणालो, तुम्ही भांडू शकत नाही. आपण लग्नाचं गाणं शूट करत आहोत. तुम्ही जरा दोन दिवसांसाठी तुमच्यातील भांडण मिटवू शकत नाही का? यानंतर आम्ही एकत्र लंच केला. पण हो त्यांच्या नात्यात दुरावा येत होता. मी अभिनेत्यांच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहणाऱ्यांमधला नाही. त्यामुळे पुढे काय घडले हे मला माहिती नाही. पण राज चित्रपटानंतर दोघे कायमचे दूर गेले".

दिनो आणि बिपाशा एका ब्लाइंड डेटवर भेटले होते. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये एका मित्राने त्यांची भेट करुन दिली होती. बिपाशा आणि दिनो 1996 ते 2002 पर्यंत नात्यात होते. 2002 मध्ये जिस्म चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान, तिने जॉन अब्राहमला डेट करायला सुरुवात केली.  पण 2011 मध्ये दोघे विभक्त झाले. 2014 मध्ये अलोन चित्रपटाच्या सेटवर अभिनेता करण सिंग ग्रोवरशी तिची भेट झाली. यानंतर दोघांनी लग्न केलं. त्यांना आता एक मुलगीही आहे. 

'राज' हा 2002 चा विक्रम भट्ट दिग्दर्शित हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात मालिनी शर्मा देखील आहे. आदित्य (दिनो) आणि संजना (बिपाशा बसू) हे जोडपे त्यांचं नातं वाचवण्यासाठी उटीला जातात. मात्र, त्याचं घर पछाडलेलं असतं. या सर्वामागे आदित्यचा भूतकाळ असतो अशी त्याची पटकथा आहे. 2002 मध्ये हा सर्वाधिक कमाई कऱणारा दुसरा चित्रपट होता.