#MeToo: अभिनेत्रींच्या वादानंतर आता दिग्दर्शकांमध्येही वाद

विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप 

Updated: Oct 10, 2018, 12:26 PM IST
#MeToo: अभिनेत्रींच्या वादानंतर आता दिग्दर्शकांमध्येही वाद title=

मुंबई : अभिनेत्रींच्या वादानंतर आता दिग्दर्शकांमध्येही वाद पहायला मिळत आहेत. दिग्दर्शक विकास बहलनं अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवनेला नोटीस पाठवली आहे. ट्विटच्या माध्यमातून आपली बदमानी केल्याचा आरोप बहलने केला आहे. त्यामुळे ट्विट मागे घेऊन समाज माध्यमावर माफी मागण्याची मागणीही त्याने केली आहे. 

वक्तव्य मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्याने दिला आहे. मीटू चळवळीअंतर्गत विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. विकास बहलला यासंदर्भात माहिती होती आणि त्यानं माफीही मागितल्याचं अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानेनं म्हटलं होतं. या दोघांनी संधीचा फायदा घेत आपली कारकीर्द खराब करण्याचा प्रयत्न केल्याचं बहलनं म्हटलं आहे. 

सध्या भारतात #MeToo या चळवळीची सगळीकडेच चर्चा आहे. रोज नवीन खुलासे या चळवळीतून होत आहेत. सोशल मीडिय़ावर महिला आपल्यावर झालेल्या अत्याचारांबाबत बोलण्यासाठी पुढे येत आहेत. यामध्ये अनेक मोठ्या चेहऱ्यांवर आरोप होत आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर अश्लिल वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर सोशल मीडियावर #MeToo मोहिमेची सुरुवात झाली.