ज्याची भीती होती मुलं तोच प्रश्न विचारायला लागले? करण जोहर का म्हणाला- 'तो माझ्यासारखा होणार नाही ना?'

Karan Johar Family : सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचं पालकत्वं स्वीकारलेला करण जोहर आता मुलांच्या संगोपनाबाबत काय म्हणतोय पाहिलं?   

सायली पाटील | Updated: Jul 8, 2024, 03:04 PM IST
ज्याची भीती होती मुलं तोच प्रश्न विचारायला लागले? करण जोहर का म्हणाला- 'तो माझ्यासारखा होणार नाही ना?' title=
bollywood celebrity Karan Johar kids have started asking questions about their mother

Karan Johar Family : निर्माता दिग्दर्शक, सूत्रसंचाक अशी एक ना अनेकरुपी ओळख असणाऱ्या करण जोहर यानं कायमच त्याची मतं अगदी स्पष्ट आणि ठामपणे मांडली आहे. अनेकदा करणला त्याच्या या सवयीमुळं काही अडचणींचा सामनासुद्धा करावा लागला आहे. पण, आता मात्र करण एका वेगळ्या परिस्थितीला सामोरा जाताना दिसत आहे. ही परिस्थिती त्याच्यापुढं अनेक प्रश्न उपस्थित करत असून, एकल पालकत्त्वाच्या त्याच्या जबाबदारीत आणखी आव्हानांची भर पाडत आहे. 

2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून करण जोहर 2 जुळ्या मुलांचा बाबा झाला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं. एक मुलगी, एक मुलगा, 81 वर्षांची आई आणि करण... असं हे कुटुंब. पण, याच कुटुंबात मोठी होणारी ही दोन्ही मुलं सध्या त्यांना पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं शोधताना दिसत आहेत. 

खुद्द करणनच एका मुलाखतीदरम्यान यासंदर्भातील खुलासा केला. 'एका आधुनिक कुटुंबासाठी हा काहीसा अनपेक्षित काळ आहे', असं तो म्हणाला. ज्याची भीती होती त्याच प्रश्नांचा सामना करण जोहर सध्या करत असून, 'आमचा जन्म कोणाच्या पोटातून झाला? मम्मा (करण जोहरची आई) ही आमची खरी आई नसून ती आजी आहे...' अशा एक ना अनेक शंका, प्रश्नांचं निरसन करण्यासाठी करण मुलांच्या शाळेत जात आहे, समुपदेशकांकडे जात आहे. ही परिस्थिती नेमकी कशी हाताळावी यासाठीच त्याचे हे प्रयत्न सुरू आहेत. या साऱ्यामध्ये मुलांची जबाबदारी आणि पालकत्वं सोपं नाही असं करण स्पष्टच म्हणतो. 

हेसुद्धा वाचा : 'दुसऱ्यांच्या लग्नात स्वत:ला विकण्यापेक्षा मला...' अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या लग्नसमारंभांवर बड्या दिग्दर्शकाच्या लेकीची बोचरी टीका 

मुलांना काहीही असंवेदनशील बोलणार नाही किंवा नकळत तशी परिस्थितीही निर्माण होणार नाही यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. याचाही खुलासा करणनं त्याच्या या मुलाखतीदरम्यान केला. आपला मुलगा सध्या गोडाचे बरेच पदार्थ खात असल्यामुळं त्याचं वजन वाढतंय. जीवनातील अशाच टप्प्यावर आपणही असेच होते या चिंतेनं करणनं एकदा करणनं मुलालाच त्याच्या वाढत्या वजनाची जाणीव करून दिली होती. पण, त्यानंतर मात्र आपल्या वक्तव्यानं तणाव निर्माण झाल्याचं ओळखत त्यानं छोट्या यशकडे यासाठी माफीसुद्धा मागितली. 

आपल्या मुलांनी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून नावारुपास यावं, त्यांच्या आवडीनिवडी जपाव्यात या आणि अशा माफक अपेक्षा करण ठेवतो आणि एकट्यानंच ही संपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो. त्याच्या पालकत्वाचं हे वेगळेपण पाहून अनेकांनाच त्याचा हेवाही वाटतो.