आता अन्नू कपूर तनुश्रीला काय म्हणाले...?

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. 

Updated: Oct 7, 2018, 03:00 PM IST
आता अन्नू कपूर तनुश्रीला काय म्हणाले...? title=

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. २००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. ज्यानंतर संपूर्ण कलाविश्वात एकच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. 

नानांबद्दलच्या या वक्तव्यानंतर अनेकांनीच तनुश्रीला पाठिंबा दिला तर काहींनी मात्र तिच्याविरोधात जात वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 

कलाविश्वात अनेकांनी या विषयांवर कोणतीच प्रतिक्रिया न देणं सोयीचं समजलं. पण, अभिनेते अन्नू कपूर यांनी मात्र याविषयी आपलं मत मांडत एक वेगळा दृष्टीकोन मांडला आहे. 

एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना अन्नू कपूर म्हणाले, 'इथे एका महिलेला अनादर झाला आहे. जर तिने केलेले आरोप खरे आणि सिद्ध होत असतील तर दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. मग समोरची व्यक्ती नाना पाटेकर असो अन्नू कपूर असो किंवा मग नरेंद्र मोदी असो. पण, अथे गुन्हा सिद्ध होणं गरजेचं आहे.'

अन्नू कपूर यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा हवाला देत ते म्हणाले होते 'या सर्व घटना उघड होताच त्याची माहिती पोलिसांमध्ये द्यावी. तर मग यामध्ये मीडिया ट्रायल का घेतली जात आहे?'

यावेळी त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेची प्रशंसा करत काही गोष्टींचा गोंधळ हा सुधारता येऊ शकतो, असं सूचक विधान केलं.