राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज'

हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे. यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही. आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्राचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्र हीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 26, 2018, 06:44 PM IST
राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र फरक सांगणारा भन्नाट दस्त'ऐवज' title=

मुंबई : हिमालयापासून दक्षिणेतील हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या आपल्या भारतवर्षातील लोकांमध्ये भारतीयत्वाची एक भावना आहे. आपली समान संस्कृती आहे. त्यातील तत्त्व एकच आहे. यामुळेच आपल्यावर अनेक आक्रमणे होऊनही आपल्यातील एकत्वाची भावना डळमळली नाही. आपली संस्कृती, आपली जीवनशैलीच आपल्या राष्ट्राचे खरे चैतन्य आहे. सांस्कृतिक राष्ट्र हीच भारताची खरी ओळख आहे व त्यामुळेच ते कित्येक शतके चैतन्यपूर्ण संघटन म्हणून टिकून राहिले आहे. 

झी २४ तासने तुम्हांला समृद्ध करणारा 'बुक फेस' नवा प्रकल्प सुरू केला आहे. त्या माध्यमातून गौरी डोखळे यांनी अनुवाद केलेल्या 'राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र' पुस्तकाची प्रकाशकाचे मनोगत, संकलकाचे मनोगत देत आहोत.  अहमदनगरच्या गोदावरी प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. 

प्रकाशकांचे मनोगत

काही वर्षांपूर्वी आम्हा सर्वांना आदरणीय असलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते कै. प्रल्हादजी अभ्यंकर यांनी माझे सासरे प्रा.डॉ. प्रभाकर मांडे यांना हैदराबाद येथील भारतीय संस्कृती प्रचार समितीने प्रकाशित केलेले 'स्टेट नेशन अँड कल्चर नेशन' हे पुस्तक दिले व त्यातील विचारांचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. एवढेच नाही तर तशी सुचनाही । केली. तेव्हापासून या पुस्तकाचा मथितार्थ जास्तीतजास्त मराठी भाषकांपर्यंत पोचावा यादष्टीने ते प्रयत्नशील होते. त्यांनी या पुस्तकाचा अनुवाद करवून घेण्यासाठी अनेकांना विनंती केली. काहींनी होकारही दिला, परंतु अनुवादाची कल्पना फलद्वप होऊ शकली नाही. तेव्हा त्यांनी माझी लहान बहीण सौ, गौरी डोखळे हिच्याकडे हे दायित्व सोपवले. तिने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले, याबद्दल तिचे करावे तेवढे कौतुक कमी पडेल. हे पुस्तक म्हणजे शब्दशः अनुवाद नाही. मात्र आशय पूर्ण यावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात आला आहे. । प्रस्तुत पुस्तक महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य श्री. अनिरुद्धजी देशपांडे यांच्याकडे अवलोकनार्थ आणि मार्गदर्शनासाठी पाठविले. त्यांनी । अनुकूल अभिप्राय देऊन पुस्तकातील आशयाचा प्रसार व्हावा असाच भाव प्रकट केला, एवढेच नाही तर त्यादृष्टीने सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. त्याबद्दल त्यांची मी आभारी आहे. आम्हाला भारतीय संस्कृती प्रचार समितीच्या सौजन्याने या पुस्तकाच्या प्रकाशनाची संधी लाभली याची धन्यता वाटते.
- प्रकाशक

संकलकांचे मनोगत

‘भारतीय संस्कृती प्रचार समिती’ या हैदराबाद येथे कार्यरत असलेल्या संस्थेचे ध्येय भारतीय संस्कृतीचा प्रसार करणे हा आहे. भारतीय संस्कृतीचे जतन ही आज काळाची गरज आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे तर, पाश्चात्य अभ्यासक, तज्ज्ञ, समाजसेवक ज्यांना भारतीयांच्या आनंदी, समाधानी आयुष्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे अशा सर्वांसाठी हा संस्कृतीचा ठेवा जपणे आवश्यक आहे.

सेवाभावी आणि कर्तव्यदक्ष व्यक्तींचे समाजातील महत्व भारतीयांनी सुरुवातीपासूनच जाणले होते आणि त्यादृष्टीने त्यांनी यशस्वी प्रयत्नही केले आहेत. त्यामुळेच आमची समिती असे प्रचारक निर्माण करू इच्छिते जे आपल्या संस्कृतीचे अनेक महत्त्वाचे पैलू व्याख्याने, चर्चासत्रे, संवाद आदींच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकतील. शिवाय आम्ही या विषयावर काही पुस्तकेही प्रकाशित करण्याचा विचार करीत आहोत.

आमचे ‘चिरंतन संस्कृती के मूलाधार’ हे पहिले हिंदी भाषेतील पुस्तक तर भारतीय कुटुंबव्यवस्थेवरील दुसरे पुस्तक हिंदी, तेलगू व इंग्रजी या तीन भाषांमध्ये छापले गेले. ‘पुरातन व गौरवशाली भारत' हे हिंदी व तेलगू भाषांत प्रकाशित झाले आहे; तर ‘भारतीय स्त्रीत्व' हे नुकतेच प्रकाशित झाले. सद्य पुस्तक हे आमचे पाचवे पाऊल आहे.

आमच्या समितीच्या सर्व सभासदांच्या एकत्र प्रयत्नांनी हे पुस्तक लिहिले गेले आहे. पुस्तकाच्या अखेरीस पुस्तक बनविताना अभ्यासल्या गेलेल्या संदर्भग्रंथांची यादी दिली आहे. या सर्व लेखक व प्रकाशकांचे आम्ही आभारी आहोत. मुख्यतः श्री दीनदयाल उपाध्याय, श्रीराम साठे आणि एम. गिरीधर यांच्या पुस्तकांमधून माहिती घेतली आहे.

‘भारतीय अध्यात्मिक धर्मनिरपेक्षता' (Indian Spiritual Secularism) आणि ‘धर्मनिरपेक्षतेच्या नावाखालील लांगुलचालन' (Appeasement Honoured as Secularism) हे दोन उतारे श्री. गिरीधर राव यांच्या पुस्तकातून घेतले आहेत. आम्ही श्री. वेणुगोपाल रेड्डी यांचेही आभारी आहोत.

आम्ही आशा करतो की हे पुस्तक आपले अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण करील.
- भारतीय संस्कृती प्रचार समिती

१. शीर्षक

१९९७ साल हे भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष. ब्रिटिश राजवटीतून मुक्त होऊन भारताला १५ ऑगस्ट १९९७ ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. हे वर्ष सर्व स्तरांवर विविध कार्यक्रम आयोजित करून साजरे केले जात आहे. तज्ज्ञमंडळी पन्नास वर्षांचा लेखाजोखा मांडीत आहेत. यशापयशाचा अभ्यास करीत आहेत. काहींच्या मते, भारताने पाकिस्तानच्या तुलनेत बरीच प्रगती केली तर काहींना वाटते की, इंडोनेशिया, मलेशिया, इस्राईल या नवनिर्मित राष्ट्रांचा अधिक विकास झाला. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांचा आढावा :-

भारतीय संस्कृती प्रचार समितीने भारतीय स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्याचे ठरविले. समितीने मुख्यतः ‘राज्यराष्ट्र’ आणि ‘सांस्कृतिक राष्ट्र' या दोन संकल्पनांवर भर द्यायचे ठरविले. एक राष्ट्र म्हणून भारताचा इतिहास वैदिक काळापासून पाहिला जाऊ शकतो. भारतीय संस्कृती ही त्याच्या इतिहासाबरोबर फुलत गेली आणि म्हणून भारतीय राष्ट्रवादाला सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणता येईल. पाश्चिमात्यांनी एकोणिसाव्या शतकात ज्या राज्य राष्ट्र पद्धतीचा प्रचार केला, त्याच पद्धतीला भारतीय राजकीय नेत्यांनी स्वीकारले.

या सिद्धांतानुसार कोणत्याही राष्ट्राची निर्मिती होण्यासाठी आधी त्यास एक राज्यशासन किंवा सबळ शासनव्यवस्था असणे आवश्यक असते. राष्ट्र राज्यशासन असल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. 

राष्ट्र आणि राज्य या भिन्न संकल्पना :-

राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांच्या दृष्टीने या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांचा आढावा घेतला आहे. त्यामुळे राज्य, राष्ट्र, राज्यराष्ट्र व सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. राज्य आणि राष्ट्र या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये अनेकवेळा गल्लत होते. पाश्चिमात्य विचारवंतांनी या विषयावर बरीच चर्चा करूनही बहुतांश वेळा या शब्दांना समान अर्थाने मानले गेले. 

राज्य म्हणजे असे प्रदेश किंवा देश ज्यांच्यावर एक शासनव्यवस्था आहे. वेगवेगळे देश, वसाहती किंवा प्रदेशांमध्ये एक समान शासनव्यवस्था असेल तर ते सर्व मिळून एक राज्य बनेल. जेथील लोक काही समान ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी एकत्र आलेले असतात व त्यांच्यामध्ये एक बांधिलकीची भावना असते. त्यास राष्ट्र म्हणतात.

जेव्हा आपण पाश्चिमात्य राष्ट्रे (Western Nations), किंवा आफ्रिकन राष्ट्रे (African Nations) म्हणतो, तेव्हा ते राष्ट्र नसून राज्य असते. संयुक्त राष्ट्रे (United Nations) ही संघटना राष्ट्रांची नाही तर ‘राष्ट्रराज्यांची' (Nation States) संघटना आहे. 

राज्य व राष्ट्र यातील फरक :-

१) राज्य व राष्ट्र यांचे मूलभूत घटक भिन्न आहेत :-

राज्यांचे चार मूलभूत घटक असतात. लोकसंख्या, प्रांत किंवा प्रदेश, सार्वभौमत्व आणि शासन. एक जरी घटक नसेल तर राज्य स्थापित होऊ शकत नाही. या उलट राष्ट्र म्हणजे अशा लोकांचा एकत्रित समूह ज्यांच्यामध्ये अत्यंत घट्ट ऐक्याची भावना व समान जाणिवा असतात. समान प्रांत, वंश, धर्म, भाषा, इतिहास, संस्कृती किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा यापैकी कोणतीही गोष्ट राष्ट्राच्या निर्मितीचे कारण ठरू शकते. तरीही या घटकांनीच राष्ट्रनिर्मिती होते असे नाही.

२) राज्य ही एक राजकीय संकल्पना आहे तर राष्ट्र ही एक सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, भावनिक व राजकीय संकल्पना आहे :-

राज्य ही राजकीय संकल्पना आहे जी त्याच्या जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, भौतिक गरजा पुरविण्यासाठी कार्यरत असते. ही माणसांच्या बाह्य कृतींशी निगडीत असते. राज्य हे कायदेशीरपणे स्थापन झालेले असते.
या उलट राष्ट्र ही एक व्यापक संकल्पना आहे. राष्ट्रातील जनता हे एकमेकांशी भावनिक, मानसिक व आध्यात्मिक दृष्टीने बांधलेले असतात.

३) प्रांताचा अधिकार हा राज्य संघटनेसाठी अत्यावश्यक असतो. पण राष्ट्र संघटनेसाठी गरजेचा नसतो.

राज्याकडे एक ठरविक प्रांत असणे अनिवार्य असते. पण राष्ट्र प्रांताच्या ठराविक सीमारेषा नसतील तरीही अस्तित्वात राहू शकते. मातृभूमीवरील प्रेम के राष्ट्र ऐक्यासाठी पुरेसे होऊ शकते. उदाहरणार्थ १९४८ पर्यंत ज्यूंचे एक राष्ट्र होते. परंतु त्यांच्याकडे एक ठराविक प्रांत नव्हता. ते त्यांच्यातील समान धार्मिक पारंपरिकतेने बांधलेले होते. १९४८ नंतर त्यांनी प्रांताच्या सीमारेषा ठरविल्या व इस्राईल राज्य (State of Israel) निर्माण झाले.

४) सार्वभौमत्व हे राज्यांना अनिवार्य असते, मात्र राष्ट्रांना नसते :-

सार्वभौमत्व हा राज्याचा आत्मा आहे. जर तेच नसेल तर राज्याचे अस्तित्वच नाहीसे होते. मात्र सार्वभौमत्व नसले तरीही राष्ट्र अस्तित्वात राहू शकते. अत्यंत घट्ट अशा भावनिकतेने राष्ट्र एकत्रित नांदते. १९४७ सालच्या आधी भारत एकाच सांस्कृतिक बंधाने बांधलेले असल्यामुळे ते एक राष्ट्र होते. मात्र स्वातंत्र्यानंतर भारतास सार्वभौमत्व, एक शासनव्यवस्था मिळाली व १९४७ नंतर भारत राज्य बनले. तरीही बहुतांश वेळा राष्ट्रासही सार्वभौमत्व मिळविण्याची महत्त्वाकांक्षा असते किंवा राष्ट्राच्या दैनंदिन व्यवस्थेसाठी राष्ट्र सार्वभौमत्व मिळविते. मात्र हे अनिवार्य नाही.

५) राष्ट्र ही संकल्पना राज्यापेक्षा व्यापक आहे.

राज्याच्या सीमारेषा या ठराविक असतात. त्या बदलल्यास त्याच्या घटनेमध्ये, अन्य राज्यांच्या संबंधांमध्ये, अन्य राजकीय व सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल करावे लागतात. वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता असलेला समाज राष्ट्र घडवतो. त्यामुळे ते व्यापक असते. त्याची ठराविक सरहद्द नसते.

६) एका राज्यामध्ये दोन राष्ट्रीयत्वाच्या व्यक्ती असू शकतात :-

दोन किंवा तीन राष्ट्रे एका राज्यामध्ये असू शकतात. पहिल्या महायुद्धाच्या आधी ऑस्ट्रिया व हंगेरी एक राज्य असूनही ते भिन्न राष्ट्र होते. त्यांच्यावर शासनव्यवस्था एकच होती. मात्र सांस्कृतिक भिन्नता होती.

७) राष्ट्र स्थिर असते :-

जेव्हा राज्याचे सार्वभौमत्व जाते तेव्हा राज्य संपते मात्र राष्ट्र तसेच राहाते. उदाहरणार्थ दुसया महायुद्धातील पराभवानंतर जर्मनी आणि जपान राज्यांचे सार्वभौमत्व जाऊन परकीय सत्ता त्यांच्यावर शासन करू लागली. त्यामुळे राज्य म्हणून त्यांचे पूर्वीचे अस्तित्व संपले.