काँग्रेसचे नेतेच आजच्या अवस्थेला जबाबदार

जेव्हा सत्ता होती तेव्हा पक्ष वाढवण्याऐवजी काँग्रेसचे नेते एकमेकांची जिरवण्याच्या प्रयत्नात होते.

Updated: Sep 11, 2019, 04:28 PM IST
काँग्रेसचे नेतेच आजच्या अवस्थेला जबाबदार title=

दीपक  भातुसे, झी २४ तास मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाला एक-एक नेता सोडून चालला आहे. काँग्रेसच्या आज झालेल्या अवस्थेला काँग्रेसचे नेतेच जबाबदार आहेत. असं म्हणावं लागेल. जेव्हा सत्ता होती तेव्हा पक्ष वाढवण्याऐवजी काँग्रेसचे नेते एकमेकांची जिरवण्याच्या प्रयत्नात होते. आता पक्ष अडचणीत असतानाही तेच सुरू असल्याचं दिसतंय. 

काँग्रेस पक्षाला गटबाजी नवी नाही.. गटबाजीचा शाप जणू या पक्षाच्या पाचवीला पूजलेला आहे. पक्ष सत्तेवर असताना ही गटबाजी दिसून आली, मात्र तेव्हा पक्षावर त्याचा परिणाम होत नव्हता. आता पक्ष अडचणीत असतानाही काँग्रेसमधील ही गटबाजी थांबायला तयार नाही. 

पक्ष सत्तेत असताना विलासराव देशमुख विरुद्ध अशोक चव्हाण, नारायण राणे विरुद्ध अशोक चव्हाण, नारायण राणे विरुद्ध विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे-पाटील, नितीन राऊत विरुद्ध सतीश चतुर्वेदी, अशोक चव्हाण विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी गटबाजी पक्षात पहायला मिळाली. 

यातील काही नेते सध्या हयात नाहीत तर काही नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. पक्ष वाढवण्यापेक्षा या नेत्यांना एकमेकांची जिरवण्यात सत्ता काळातील वेळ घालवला आणि पक्षाचीच जिरवली. आता पक्ष अडचणीत असतानाही यातील काही नेत्यांमधील संघर्ष पहायला मिळत आहे. 

मिलिंद देवरा विरुद्ध संजय निरुपम या वादाला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तर सरकारची पोलखोल यात्रा काढणाऱ्या नाना पटोले यांच्याविरुद्ध विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हा संघर्ष समोर आल्याने पोलखोल यात्राही फोल ठरली. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने खरं तर जोमाने कामाला लागायला हवं होतं. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी पराभवातूनही धडा घेतलेला नाही. आपला इगो सांभाळताना ज्या पक्षामुळे आपण मोठे झालो तो पक्षच रसातळाला चाललाय याचं भानही पक्षातील नेत्यांना राहिलं नाही. 

पक्षातील नेत्यांचे मतभेद दूर करून सर्वांना एकत्र कामाला लावण्यात पक्षाचं नेतृत्वही कमी पडलं असं म्हणावं लागेल. त्यामुळे एकमेकांची जिरवण्याच्या नादात आपण पक्षाचीच जिरवतोय हे आजही काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात येताना दिसत नाही.