Ashadhi Ekadashi 2023 : चला चला पंढरीला! आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस

Pandharur Wari 2023 :  आषाढी वारी ही वारकर्‍यांसाठी आनंदाची ठरणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी वारीसंदर्भात खास नियोजन केले असून आता वारीच्या दिवशी पंढपूर गाठणं  सोपं होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून खास नियोजनही करण्यात आले आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 20, 2023, 09:09 AM IST
Ashadhi Ekadashi 2023 : चला चला पंढरीला! आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार बस title=
Ashadhi Wari 2023 Special Bus Service

Ashadhi Wari 2023 Special Bus Service : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Wari 2023) दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऐतिहासिक वारीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा वारीत वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्राकारिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने (st mahamandal) राज्यभरातून 5 हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 25 जून ते 5 जुलै दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (27 जून रोजी) 200 जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर आषाढी (Pandharur Wari 2023) यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्त्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांनी वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरुपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असणार आहे. 

सहा विभागांतून पाच हजार बस 

आषाढी यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेसाठी एसटीकडून सुमारे पाच हजार गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद विभागातून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 आणि अमरावती विभागातून 700 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

चार तात्पुरत्या बसस्थानकांचे अद्ययावतीकरण 

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविकांसाठी विविध विभाग बसेस सोडणार आहेत. वारकरी, भाविक आणि पर्यटकांची होणारी प्रचंड गर्दी पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ स्वच्छतागृहे, संगणकीकृत आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, दिशादर्शक फलक अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आजपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर  24 तास खुलं

पंढरपुरातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आजपासून 24 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी ही माहिती दिली. 7 जुलैपर्यंत विठोबा-रखुमाईचं दर्शन भाविकांना 24 तास घेता येणार आहे. तसंच आषाढी एकादशी काळात भाविकांना देवाचं दर्शन सुखकर होण्यासाठी, मंदिर समिती आणि प्रशासनाकडून विशेष उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.