'दहशतवाद संपवायचा असेल तर पंतप्रधानपदी मोदीच हवेत'

राजकारण हे गणितासारखे नसून रसायनशास्त्रासारखे असते.

Updated: Apr 11, 2019, 09:43 PM IST
'दहशतवाद संपवायचा असेल तर पंतप्रधानपदी मोदीच हवेत' title=

ठाणे: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ भिवंडीतील गोपाल नगर येथे गुरुवारी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. गोपाल नगर परिसरात उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यादृष्टीने सिन्हा यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिन्हा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. देशातून दहशतवादाचे उच्चाटन करायचे असेल तर भाजपची सत्ता आणि पंतप्रधानपदी मोदींनी पुन्हा येणे आवश्यक आहे. 

आज भारताने एवढी प्रगती केलेय की, तीन मिनिटांमध्ये पूर्ण पाकिस्तान उद्ध्वस्त करण्याची शक्ती भारताकडे आहे. एकीकडे पाकिस्तान मृतदेह मोजत असताना आपल्याकडील विरोधी पक्ष पुरावे मागत आहेत. घटकपक्षांच्या सरकारबद्दल भारताचा आजवरचा अनुभव वाईट आहे. कारण, राजकारण हे गणितासारखे नसून रसायनशास्त्रासारखे असते. ज्याप्रमाणे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच संयोग होऊन पाणी तयार होते. तसेच महाराष्ट्रात पंजा आणि आघाडी एकत्र आले तरी सत्ता ही कमळ किंवा बाणाचीच येईल, असे सिन्हा यांनी सांगितले.