पुराच्या पाण्यात कार किंवा बाईक वाहून गेली तर विमा क्लेम करता येतो का?

कार विमाच्या (Car Insurance) माध्यमातून तुम्ही कारच्या नुकसानाची भरपाई मिळवू शकता. पण नैसर्गिक संकटामुळे वाहनांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला विमा घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 10, 2023, 12:27 PM IST
पुराच्या पाण्यात कार किंवा बाईक वाहून गेली तर विमा क्लेम करता येतो का? title=

सध्याच्या घडीला देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान, काही ठिकाणी साचलेल्या पाण्यात गाड्या, दुचाकी अडकल्याचं दिसत आहे. तर काही ठिकाणी गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. या नैसर्गिक संकटात कारचं नुकसान झालं असेल तर सर्वात आधी मनात विचार येतो की, विमा कंपनी (Insurance Company) याची भरपाई देईल का? तर मग समजून घ्या

तुम्ही वाहन विमाच्या माध्यमातून गाडीच्या नुकसानाची भरपाई मिळवू शकता. पण यासाठी जेव्हा तुम्ही वाहन विमा (Motor Insurance) खरेदी करता तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुम्हाला नुकसानभरपाईचा दावा करताना कोणतीही अडचण येणार नाही. 

विमा घेताना फक्त अपघाताचा विचार करु नका

वाहन विमा (Motor Insurance) घेताना फक्त चोरी होण्याचा किंवा तिचे पार्ट्स खराब होण्याचा, अपघाताचा विचार करु नका. विमा खरेदी करताना पाऊस किंवा पूरासारख्या नैसर्गिक संकटातही नुकसान होऊ शकतं याचा विचार करत आपल्या गरजा पूर्ण होत आहेत हेही चाचपणं गरजेचं आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत तुम्ही नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानाची भरपाई विमाच्या माध्यमातून मिळवू शकता. 

या गोष्टींची घ्या काळजी

पूर आल्यानंतर किंवा पाणी साचल्यानंतर अनेक गाड्या पाण्यात अडकलेल्या दिसतात. यामुळे गाडीच्या इंजिनपासून ते बॉडीपर्यंत अनेक गोष्टींचं नुकसान होतं. पण बाजारात अशा अनेक विमा योजना आहेत, ज्या अशा प्रकारचं नुकसान क्वहर करतात. फक्त तुम्ही विमा घेताना या गोष्टी कान आणि डोळे उघडे ठेवून पाहा. 

विमा खरेदी करताना इंजिन कव्हरवर जास्त भर द्या. नैसर्गिक संकटात इंजिन सीझ झाल्यास हायड्रोस्टेटिक लॉक म्हणतात. अशा प्रकरणांमध्ये कंपन्या पैसे देत नाहीत. कारण या दुर्घटनांना श्रेणीनुसार विभागण्यात आलेलं असतं. मोटार वाहन कायदा 1988 नुसार, पूर, पाऊस आणि वादळ किंवा अन्य नैसर्गिक संकटामुळे होणारं नुकसान ऑन डॅमेजमध्ये कव्हर होतं. त्यामुळे अशी विमा योजना निवडा ज्यामध्ये इंजिन सुरक्षेचा पर्याय उपलब्ध असेल. 

जर तुम्ही गाडीसाठी सर्वसमावेशक मोटर विमा घेतला असेल तर वादळ, पाऊस किंवा इतर नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसानावर दावा करु शकतात. या योजनेत ऑन डॅमेज आणि थर्ड पार्टी कव्हर असे दोन भाग असतात. ऑन डॅमेज तुमच्या कारला नैसर्गिक संकट किंवा अन्य कारणामुळे होणारं नुकसान कव्हर करतं आणि वीमा कंपन्या तुमच्या नुकसानाची भरपाई करतात.