BCCI ने आतातरी जागं व्हावं! रणजीमध्ये संजूचा जलवा, चौकार-षटकारांची आतषबाजी

टीम इंडियामधून बाहेर पडताच रणजी ट्रॉफीमध्ये संजूचं वादळ!

Updated: Dec 13, 2022, 07:22 PM IST
BCCI ने आतातरी जागं व्हावं! रणजीमध्ये संजूचा जलवा, चौकार-षटकारांची आतषबाजी   title=

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी 2022 च्या पहिल्या दिवशी अनेक सामने खेळले गेले. यामधील टीम इंडियामध्ये बाहेर बसवल्या गेलेल्या अनेक खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं. यामधील कायम डावलला जाणाऱ्या संजू सॅमसनने पुन्हा एकदा जलवा दाखवून दिला आहे. केरळ आणि झारखंडमधील सामन्यात संजू केरळ संघाचं कर्णधारपद भूषवत आहे. या सामन्यात संजूने पाचव्या नंबरला खेळायला येत चेंडूने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. (Trending Ranji Trophy keral vs jharkhand latets marathi sport News)

केरळ संघाची सुरूवात चांगली झाली होती. पहिली विकेट गेल्यावर मात्र तारांबळ उडालेली दिसली. 3 विकेट्स पडल्यावर फलंदाजीला आलेल्या संजूने 108 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. संजूच्या खेळीच्या जोरावर केरळच्या संघाने 200 धावांचा टप्पा पार केला. 

केरळचे सलामीवीर रोहन प्रेमने 79 आणि रोहन कुन्नुम्मल 50 धावा यांनी मजबूत भागीदारी केली होती. अक्षय 39 आणि सिजोमन 28 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केरळने 6 गडी गमावून 276 धावा केल्या आहेत. दुसरीकडे झारखंडसाठी शाहबाज नदीमने चांगली गोलंदाजी केली. त्याने 29 षटकांत 108 धावांत तीन बळी घेतले. तर उत्कर्ष सिंगने 21 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले.  

दरम्यान, संजूच्या खेळीवरून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला धारेवर धरलं आहे. BCCI ने आतातरी जागं व्हावं असं नेटकऱ्यांंचं म्हणणं आहे. कारण संजूसारखा खेळाडू जर बेंचवरच बसून राहिला तर त्याच्या टॅलेंटचा आणि प्रतिभेचा टीम इंडियाला कधी फायदा होणार? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.