T20 वर्ल्ड कपमध्ये मॅच टाय झाल्यास? पाऊस आल्यास? जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

T20 World Cup:  अमेरिकेत क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी टी 20 वर्ल्ड कप येथे खेळवण्यात येतोय. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 1, 2024, 04:46 PM IST
T20 वर्ल्ड कपमध्ये मॅच टाय झाल्यास? पाऊस आल्यास? जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे  title=
T20 World Cup Rules

T20 World Cup: टी 20 वर्ल्ड कप 2 ते 29 जूनदरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. अमेरिकेमध्ये पहिल्यांदा आयसीसी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जात आहे. भारतीय टीमचा ग्रुप आपल्या चारही मॅच अमेरिकेत खेळणार आहे. अमेरिकेत क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी टी 20 वर्ल्ड कप येथे खेळवण्यात येतोय. 

या वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 टीम्स खेळतील. ज्यातील प्रत्येक 5 टीम्स या 4 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागल्या गेल्या आहेत. टीम इंडियाने 2007 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. यानंतर 17 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी रोहित आणि कंपनी न्यूयॉर्कमध्ये पोहोचली आहे. 

आयसीसी टुर्नामेंटमध्ये नवे नियम आणण्यात आले आहेत. मॅच टाय झाली तर निर्णय कसा घेतला जाणार? पावसाने व्यत्यय आणला तर मॅचचा निकाल कसा लागणार? टीम इंडियाच्या ग्रुपमध्ये कोणते संघ आहेत? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर याची उत्तरे जाणून घेऊया. 

टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. यात यजमान अमेरिका, आयर्लंड, कॅनडा आणि पाकिस्तान या टीम्स आहेत. टिम इंडियाच्या ग्रुप स्टेजमधील सर्व चारही मॅच भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवल्या जाणार आहेत. 

चारही ग्रुपमधून टॉपच्या 2-2 टीम्स सुपर 8 साठी क्वालिफाईड होतील. यानंतर 2-2 टीम्स सेमीफायनल्समध्ये एन्ट्री करतील. सेमीफायनल्समध्ये विजेत्या टीम्स फायन्समध्ये एकमेकांना भिडतील. 

सामना टाय झाला तर?

टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल.

सुपर ओव्हरपण टाय झाली तर काय?

जोपर्यंत मॅचचा निर्णय लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. यासाठी 1 तासांचा अवधी दिला जाईल. यामध्येही निकाल आला नाही तर ग्रुप स्टेज आणि सुपर 8 मध्ये दोन्ही टिम्सना समान गुण दिले जातील. 

सेमीफायनलमध्ये असे झाले तर सुपर 8 मध्ये मोठी रॅंक असलेल्या टीमला फायनलचे तिकिट मिळेल. 

 पावसाचा व्यत्यय आला तर?

 टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये निर्णायक क्षणासाठी किमान 5 ओव्हर खेळवणे आवश्यक राहिलं.  लीग स्टेज आणि सुपर 8 मध्ये हा नियम लागू असेल. असे असतानाही पाऊस थांबला नाही तर दोन्ही टीम्सला समान गुण वाटून दिले जातील. 
 
सेमी फायनल आणि फायनलच्या दिवशी पाऊस आला तर 10-10 ओव्हरीची तरी मॅच होईल. पण पाऊस किंवा अन्य कोणत्या कारणामुळे मॅच झाली नाही तर यासाठी रिझर्व डे असेल. 
 
 दुसऱ्या सेमीफायनलला रिझर्व डे नसेल. कारण दुसऱ्या दिवशीच फायनलची मॅच खेळवली जाणार आहे. असे असताना त्यावेळी 250 मिनिटांचा वेळ दिला जाईल. 
 
वर्ल्ड कप फायनलसाठी रिझर्व डे असेल. त्यादिवशीही निकाल आला नाही तर दोन्ही टीम्सना संयुक्त विजेत्या म्हणून घोषित केले जाईल.