T20 WC 2022 Semifinal: पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्या तर? या दोन टीम गाठणार फायनल

T20 World Cup मध्ये आता सेमीफायनलची चुरस रंगणार आहे, पण ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहाता पावासाचं खेळावर सावट आहे, वाचा अशा परिस्थितीत नियम काय सांगतो?

Updated: Nov 8, 2022, 10:22 PM IST
T20 WC 2022 Semifinal: पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्या तर? या दोन टीम गाठणार फायनल title=

T20 World Cup Semifinal : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेली टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बुधवार आणि गुरुवारी सेमीफायनची चुरस रंगणार आहे. बुधवारी पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यान (New Zealand vs Pakistan) रंगणार आहे. तर गुरुवारी भारताचा सामना इंग्लंडशी (India vs England) रंगणार आहे. कोणत्या दोन टीम फायनलमध्ये प्रवेश करणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. पण ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहता सेमीफायनलवर (SemiFinal) पावसाचं सावट आहे. सेमीफायनलच्या दिवशी पाऊस पडला तर काय? अशा परिस्थितीत काय पर्याय असू शकतात ते जाणून घेऊया.

सेमीफायनलच्या दिवशी पाऊस पडला तर काय?
टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup) राखीव दिवस केवळ सेमीफायनल आणि फायनल सामन्यांसाठी ठेवण्यात आला आहे. 9 नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी न्यूझीलंड आण पाकिस्तानदरम्यानच्या पहिल्या सेमीफायनलदरम्यान पावसाचा व्यत्यय आला तर हा सामना 10 नोव्हेंबरला खेळवला जाईल. पहिल्या दिवशी काही वेळाचा सामना झाला तर उर्वरीत सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे राखीव दिवशी खेळवला जाईल. 10 नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी होणाऱ्या भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यालाही हेच नियम लागू असतील. या सामन्यासाठीही राखीव दिवस आहे. 

राखीव दिवशीही पाऊस पडला तर?
ऑस्ट्रेलियात सध्या अनिश्चित वातावरण आहे. अशात दोन्ही सेमीफायनल पावसामुळे खेळवल्या गेल्या नाहीत तर काय? अशावेळी सुपर12 च्या पॉईंट टेबलनुसार फायनलमध्ये पोहोचणारे दोन संघ निश्चित केले जातील. म्हणजे ग्रुप ए मधून न्यूझीलंड तर ग्रुप बीमध्ये भारत अव्वल स्थानावर आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करतील.

सेमीफाइनलचं टाईमटेबल
- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान- 9 नोव्हेंबर, सिडनी (दुपारी 1.30 वाजता)
- भारत विरुद्ध इंग्लंड - 10 नोव्हेंबर, एडिलेड (दुपारी 1.30 वाजता)