अजिंक्य रहाणे-युसुफ पठाणमध्ये मैदानात बाचाबाची

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमातल्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईने बडोद्याचा पराभव केला.

Updated: Dec 14, 2019, 07:32 PM IST
अजिंक्य रहाणे-युसुफ पठाणमध्ये मैदानात बाचाबाची title=

बडोदा : रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमातल्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईने बडोद्याचा पराभव केला. मुंबईने ही मॅच ३०९ रननी जिंकून मोसमाची जोरदार सुरुवात केली आहे. पण या मॅचच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचा वाद पाहायला मिळाला. अजिंक्य रहाणे आणि युसुफ पठाण यांच्यात मैदानातच बाचाबाची झाली.

मुंबईकडून पराभव टाळण्यासाठी बडोद्याची टीम शेवटच्या दिवशी संघर्ष करत होती. तेव्हा मैदानात युसुफ पठाण होता. युसुफ पठाणकडून बडोद्याने अपेक्षाही ठेवल्या होत्या. पण इनिंगच्या ४८व्या ओव्हरमध्ये शशांक अतर्डेच्या बॉलिंगवर युसुफ पठाण कॅच आऊट देण्यात आलं. पण या निर्णयामुळे युसुफ पठाण नाराज होता. आऊट दिल्यामुळे हैराण झालेला युसुफ पठाण क्रीजवरच उभा राहिला. यानंतर अजिंक्य रहाणे पठाणजवळ पोहोचला. यावेळी पठाण आणि रहाणेमध्ये बराच वेळ आऊटच्या निर्णयावरुन वाद झाला. दुसरीकडे कर्नाटक आणि तामीळनाडूच्या मॅचमध्येही करुण नायर आणि दिनेश कार्तिक यांच्यात कडाक्याचं भांडण पाहायला मिळालं,

भारतीय टीममधून बाहेर असलेला पृथ्वी शॉ या मॅचचा हिरो ठरला. पहिल्या इनिंगमध्ये ६६ रन करणाऱ्या शॉने दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त १७९ बॉल खेळून २०२ रनची द्विशतकी खेळी केली. यामुळे पृथ्वी शॉने पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी दरवाजे ठोठावले आहेत.