सौराष्ट्रने इतिहास घडवला, पहिल्यांदाच पटकवली रणजी ट्रॉफी

भारताची सगळ्यात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीला नवा चॅम्पियन मिळाला आहे.

Updated: Mar 13, 2020, 08:15 PM IST
सौराष्ट्रने इतिहास घडवला, पहिल्यांदाच पटकवली रणजी ट्रॉफी title=
फोटो सौजन्य : सौराष्ट्र टीम ट्विटर अकाऊंट

राजकोट : भारताची सगळ्यात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीला नवा चॅम्पियन मिळाला आहे. २०१९-२० या मोसमाची रणजी ट्रॉफी सौराष्ट्रने पटकवाली आहे. सौराष्ट्रने फायनलमध्ये बंगलाचं विजयाचं स्वप्न मोडलं.

सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यातली फायनल राजकोटमध्ये खेळवली गेली. सौराष्ट्रने पहिले बॅटिंग करुन ४२५ रन केले. चेतेश्वर पुजाराने पहिल्या इनिंगमध्ये ६६ रन केले. यानंतर बॅटिंगला आलेल्या बंगालच्या टीमला ३८१ रनच बनवता आले. त्यामुळे सौराष्ट्रला पहिल्या इनिंगमध्ये ४४ रनची आघाडी मिळाली.

सौराष्ट्रने पाचव्या दिवशी पुन्हा बॅटिंगला सुरुवात केली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत सौराष्ट्रने १०५/४ एवढा स्कोअर केला. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या आघाडीमुळे सौराष्ट्रला विजेता घोषित करण्यात आलं. दुसऱ्या इनिंगमध्ये सौराष्ट्रच्या हार्विक देसाईने २१, अवी बारोटने ३९ आणि विश्वराज जडेजाने १७ रन केले.

सौराष्ट्रने याआधी ३ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला होता, पण एकदाही त्यांना रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं नव्हतं. २०१२-१३ आणि २०१५-१६ च्या मोसमात मुंबईने सौराष्ट्रचा फायनलमध्ये पराभव केला होता. तर मागच्या वर्षी विदर्भाविरुद्धच्या फायनलमध्येही सौराष्ट्रला पराभवाचा सामना करावा लागला होता.

दुसरीकडे बंगालकडे ३० वर्षात पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याची संधी होती, पण याचा फायदा त्यांना उचलता आला नाही. बंगालने १९८९-९० साली बंगालने रणजी ट्रॉफी जिंकली होती. यानंतर २००५-०६, २००६-०७ या दोन वर्षी बंगालची टीम फायनलमध्ये पोहोचली होती, पण त्यांना जिंकता आलं नव्हतं.