National Sports Day 2023 : सामना सुरू असताना बॉल एकदा का पट्ट्यात आला की, त्याचा निकाल लागलाच म्हणून समजा. हॉकी स्टिकमध्ये जादू होती की काय? असा सवाल विचारला जावा, इतकं कर्तृत्व कोणा एका खेळाडूमध्ये असेल तर ते मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद (Major dhyan chand) यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशात नॅशनल स्पोर्ट डे (National Sports Day) म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात आहे. हॉकीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचं काम मेजर ध्यानचंद यांनी केलंय. मेजर ध्यानचंद यांनी लिहिलेला इतिहास कधीही न पुसण्याजोगा आहे. ध्यानचंद यांच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. मात्र, मेजर ध्यानचंद यांच्या देशभक्ती विषयीचा 'तो' किस्सा तुम्हाला माहित आहे का?
मेजर ध्यानचंद म्हणजे भारतासाठी हॉकीचा सुवर्णकाळ. त्यांनी ऑलिम्पिक गेममध्ये सुवर्णपदकं जिंकून दिली आहेत. यामध्ये 1936 ची बर्लिन ऑलिम्पिक खास होती. त्याला कारण देखील खास होतं. भारत स्वातंत्र्य होण्याच्या 11 वर्षाआधी म्हणजेच 15 ऑगस्ट याच दिवशी हुकूमशहा हिटलरसमोर ध्यानचंद यांनी असा काही गेम पलटवला की, हिटलर देखील बघतच राहिला. या सामन्यात भारताने म्हणजे त्यावेळत्या ब्रिटिश इंडियाने ध्यानचंद यांच्या नेतृत्वात जर्मनीचा 8-1 ने पराभव केला होता.
तर झालं असं की , सामना खेळवला जाणार होता हा 14 ऑगस्टला. मात्र, पावसामुळे सामना खेळवण्यात आला तो 15 ऑगस्ट रोजी. फायनल सामन्यात आमने सामने होते... भारत आणि जर्मनी. सामना सुरू झाला. जर्मनीने आक्रमण सुरू केलं अन् पहिल्याच हाफमध्ये जर्मनीने एक गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. आता दुसऱ्या हाफमध्ये जादू दाखवण्याची गरज होती. त्यावेळी मैदानात चिकचिक होतीच. ध्यानचंद यांनी त्यावेळी बुट न घातला खेळण्याचा निर्णय घेतला. बुट न घातला ते मैदानात उतरले अन् वाऱ्याच्या वेगाने पळू लागले. अशक्य वाटणारा सामना भारताने 8-1 च्या फरकाने जिंकला. ध्यानचंद यांचा हा खेळ पाहून खुद्द हिटलर देखील आवाक् झाला. पदक देताना हिटलरने ध्यानचंद यांची खास भेट घेतली आणि त्यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफर दिली. तुम्हाला आम्ही मिलिट्रीमधील सर्वोच्च सन्मान देऊ, असं हिटलर म्हणाला. पण ध्यानचंद यांच्या देशभक्तीसमोर हिटलरचा टिकाव लागला नाही.
भारताच्या या विजयानंतर हिटलरने सर्वांनी जंगी पार्टी दिली. मात्र, या पार्टीला ध्यानचंद यांनी हजेरी लावली नाही. त्याऐवजी ते मैदानात बसले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्या अश्रू पाहून एका सहकाऱ्याने विचारलं. एवढा मोठा सामना जिंकल्यानंतर डोळ्यात पाणी का? त्यावेळी त्यांनी सांगितलं. आज युनियन जॅकच्या जागी आपला तिरंगा असता तर मला आनंद झाला असता. ध्यानचंद यांनी अॅमस्टरडॅम 1928 आणि लान्स ऍजाइल 1932 ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्यांनी तिसरं गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं.
दरम्यान, ध्यानचंद हे बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते. भारताला सलग तीन ऑलिम्पिक गेममध्ये त्यांनी विजय मिळवून दिला होता. त्यांनी देशांतर्गत खेळात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आत्तापर्यंत 1000 हून अधिक गोल केले आहेत. त्यांचा हा रेकॉर्ड मोडणं अजूनही कोणाला जमलं नाही.