MI vs KKR | मुंबईला पराभूत केल्यानंतरही कोलकातावर दंडात्मक कारवाई, पण का?

आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे? तर याचं कारण आहे...

Updated: Sep 24, 2021, 12:23 PM IST
MI vs KKR | मुंबईला पराभूत केल्यानंतरही कोलकातावर दंडात्मक कारवाई, पण का? title=

दुबई : आयपीएल 2021 चा पहिला हाफ केकेआरसाठी इतका चांगला नसला तरी दुसरा हाफ खेळाच्या दृष्टीने चांगला ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेले त्याचे दोन्ही सामने जिंकले आहेत. यासह, हा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत देखील सामील झाला आहे. 23 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कब्जा करत मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. परंतु असे असूनही कॅप्टन इऑन मॉर्गन आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या संपूर्ण टीमला आपला खिसा सैल करण्याची वेळ आली.

केकेआरला मुंबई इंडियन्सवर विजय मिळवल्यानंतर देखील 24 लाख रुपये मोजावे लागले आहेत.

आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे? विजय झाल्यानंतर देखील संघाला आणि कॅप्टनला कसला दंड थोटावला गेला आहे?

त्यामागचे कारण आहे संघाचा स्लो ओव्हर रेट म्हणजेच मॅचदरम्यान संथ गतीने ओव्हरचा शेवट करणे. आता तुम्ही म्हणाल की यासाठी तर 12 लाख रुपये दंड लागतो, मग केकेआरच्या कर्णधाराला 24 लाख रुपयांचे नुकसान का झाले? तर याचे कारण आहे की, या हंगामात केकेआर संघाने दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटची चूक केली आहे. ज्यामुळे त्यांना 24 लाख रुपये दंड लावला गेला आहे.

तसे पाहाता फक्त कॅप्टनलाच स्लो ओव्हर रेटचा फटका सहन करावा लागला नाही, तर त्याचा परिणाम प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंवरही झाला आहे. कारण त्यांना देखील किमान 6 लाख रुपये दंड किंवा मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

KKRकडून MI चा 7 गडी राखून पराभव

अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना मुंबई संघाने 20 षटकांत 6 बाद 155 धावा केल्या. त्यानंतर मैदानावर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या कोलकाता संघाने व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्या ज्वलंत फलंदाजीच्या जोरावर 15.1 षटकांत हे लक्ष्य गाठले.