'राम सिया राम' गाण्यावर केशव महाराजची एन्ट्री, विराट कोहलीची धनुष्य पोझ सोशल मीडियावर व्हायरल

Ind vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज फलंदाजीसाठी उतरताच मैदानावर 'राम सिया राम' गाणं वाजवलं. यावर विराट कोहलीने धनुष्यबाण खेचण्याची पोझ दिली. 

राजीव कासले | Updated: Jan 3, 2024, 08:02 PM IST
'राम सिया राम' गाण्यावर केशव महाराजची एन्ट्री, विराट कोहलीची धनुष्य पोझ सोशल मीडियावर व्हायरल title=

Ind vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय दक्षिण आफ्रिकेला चांगलाच महागात पडला. मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 55 धावांवर तंबूत परतला. सिराजने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेची कसोटी इतिहासातील ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.

विराट कोहलीची पोझ व्हायरल
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान विरोट कोहलीचा (Virat Kohli) एक अनोखा अंदाज पाहिला मिळाला. विराट कोहलीचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केशव महाराज (Keshav Maharaj) फलंदाजीसाठी मैदानावर उतरताच स्टेडिअममध्ये आदिपुरुष चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणं वाजलं. हे पाहून विराट कोहली चांगलाच खूश झाला. त्याने हाथ जोडले आणि भगावन श्रीराम सारखं धनुष्य खेचण्याची पोझ दिली. मैदानावरच हे दृष्य पाहून स्टेडिअममधील प्रेक्षक चांगलेच खुश झाले. कोहलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

वन डे सीरिजमध्येही वाजलं होतं गाणं
याआधी एकदिवसीय मालिकेतही केशव महाराजसाठी हे गाणं वाजलं होतं. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्याा एकदिवसीय सामन्यात केशव महाराज फलंदाजीसाठी मैदानात उतरताच 'राम सिया राम' हे गाणं वाजवण्यात आलं होतं. त्यावेळी केएल राहुलने मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. 

भारताची भेदक गोलंदाजी

त्यााआधी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 55 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजने 9 षटकात अवघ्या 15 धावा देत 6 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमारने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे केवळ दोन फलंदाज दुहेरी धावसंख्या करुन शकले. पण टीम इंडियाला याचा फायदा उचलता आला नाही. टीम इंडियाचाही संपूर्ण संघ अवघ्या 153 धावांवर बाद झाला. टीम इंडयाचे तब्बल सहा फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा, एनगिडी आणि नांद्रे बर्गरने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.