IPL 2024 : 'माझी घरवापसी झाली अन्...', मुंबईचा कॅप्टन झाल्यावर पहिल्यांदाच बोलला Hardik Pandya, म्हणतो...

Hardik Pandya Statement : आधीही इथंच होतो, दोन वर्षासाठी गेलो होतो, आता माझी घरवापसी झालीये, असं हार्दिक पांड्या म्हणतो. त्यावेळी पांड्याने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Mar 5, 2024, 04:10 PM IST
IPL 2024 : 'माझी घरवापसी झाली अन्...', मुंबईचा कॅप्टन झाल्यावर पहिल्यांदाच बोलला Hardik Pandya, म्हणतो... title=
Hardik Pandya First Statement Over Mumbai Indians Captaincy Before IPL 2024

Hardik Pandya On Mumbai Indians : मोक्याच्या क्षणी जखमी होण्याची परंपरा हार्दिक पांड्या नेहमी कायम ठेवतो. टीम इंडियातील त्याच्या अनुपस्थितीमुळे पांड्या अनेकदा ट्रोल देखील झाला आहे. अशातच आता मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) रोहित शर्मा नाही तर हार्दिक पांड्या कॅप्टन असणार आहे. अशातच आता एका मुलाखतीत मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने कॅप्टन्सी स्विकारल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रिश्ते मैं हम आपके कॅप्टन लगते है, नाम है पांड्या, म्हणत हार्दिकने फॅन्सला विश्वास दिला आहे. 

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

फॅन्सकडून प्रेम मिळणं माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. माझी क्रिकेटचं करियर इथंच सुरू झालं. या शहराने मला खूप काही शिकवलंय. एक गुजरातचं पोरगं बडोदावरून इथं आलं अन् या शहराने मला खूप काही शिकवलं. आधीही इथंच होतो, दोन वर्षासाठी गेलो होतो, आता माझी घरवापसी झालीये, असं हार्दिक पांड्या म्हणतो. त्यावेळी पांड्याने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.

मुंबई शहराने दिलेलं प्रेम आणि शिकवण ही माझ्यासाठी अनमोल आहे. रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी हार्दिकला चांगलंच ट्रोल केलं होतं. अशातच आता पांड्याने फॅन्सला समर्थन देण्याचं आव्हान केलंय. मला विजयाकडे प्रवृत्त करण्यासाठी माझ्या चाहत्यांचा असाच पाठिंबा हवा आहे. तुम्ही निश्चित रहा, मी एक रोमांचक हंगाम चाहत्यांसाठी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. हा असा प्रवास आहे ज्याचा आपण सर्व एकत्र आनंद घेऊ शकतो, असंही हार्दिक पांड्या म्हणतो.

पाहा Video

दरम्यान, मला आठवतंय की, 2015 ची आयपीएल माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. माझ्यासाठी हा सिझन माझं आयुष्य बदलवणारा होता. या हंगामात मी नॉक आऊट सामन्यात संघासाठी योगदान देऊ शकलो याचा मला आनंद आहे. खासकरून माझ्या करियरमधील तो बेस्ट प्रसंग होता. बाद फेरीमध्ये दोन वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणं हा माझ्यासाठी खास अनुभव देखील होता, असंही मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन म्हणाला आहे. 

मुंबई इंडियन्स : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड , विष्णू विनोद.

नवे खेळाडू : जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.