Cricket World Cup गाजवलेला खेळाडू आता करतोय 'हे' काम, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत

आपल्या देशात काही क्रिकेटपटू रातोरात श्रीमंत होतात, तर काही खेळाडू प्रसिद्धीझोतापासून दूर फेकले जातात

Updated: Sep 14, 2022, 05:11 PM IST
Cricket World Cup गाजवलेला खेळाडू आता करतोय 'हे' काम, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत title=

Cricket World Cup : भारतात क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय खेळ आहे. आपल्या देशात क्रिकेटपटूंवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडतो. आयपीएल (IPL) स्पर्धेमुळे तर नवख्या खेळाडूंवरही कोटींची बोली लावली जाते. आयपीएल स्पर्धेत खेळणारा खेळाडू रातोरात श्रीमंत बनतो.  क्रिकेटपटू जाहिराती (Advertise) आणि व्यापारातून देखील कोट्यवधी रुपये कमवत असतात. पण असे काही खेळाडू असेही आहेत जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत (International) खेळल्यानंतरही प्रसिद्धी आणि पैशापासून दूर राहिले. या खेळाडूंना आज दोन वेळच्या जेवणासाठीही झगडावं लागतंय.

अशाच काही खेळाडूंपैकी एक म्हणजे भालाजी डामोर (Bhalaji Damor). दृष्टीहीनांच्या क्रिकेटमध्ये (Blind Cricket) दमदार कामगिरी करणाऱ्या भालाजी डामोर यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गायी-म्हशी चरायला नेण्याची वेळ आली आहे. भालाजी डामोर यांनी 1998 दृष्टीहीनांच्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत (1998 Blind Cricket World Cup) भारताचं नेतृत्व केलं होतं. पण आज त्यांचं नावही कोणाला माहित नाही. 

वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी
1998 मध्ये झालेल्या दृष्टीहीनांच्या क्रिकेट स्पर्धेत भालाजी डामोर यांनी आपल्या कामगिरीची छाप उमटवली होती. त्यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली पण सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा पराभव केला.

नोकरी मिळाली नाही
दृष्टीहीनांच्या क्रिकेटमध्ये भालाजी डामोर यांचा रेकॉर्डही जबदरस्त आहे. त्यांनी तब्बल 125 सामने खेळले, त्यात 3125 धावा आणि 150 विकेट घेतल्या. 1998 वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे माजी राष्ट्रपती के आर नारायण (K R Narayan) यांच्या हस्ते भालाजी डोमार यांना पुरस्कारही देण्यात आला होता. पण यानंतरही भालाजी डामोर उपेक्षितच राहिले. त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही. 

कुटुंबासाठी करावं लागतंय हे गाव
भालाजी डामोर हे अरावली जिल्ह्यातील पिपराणा गावात रहातात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भालाजी डामोर शेतात मजूरी करतात. याशिवाय गायी-म्हशी चरायला नेतात. पत्नी आणि मुलगा असं भालाजी डामोर यांचं कुटुंब आहे. सरकारने आपली व्यथा समजून घ्यावी अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.