ईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय?

Team India : अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही. अशाच काही खेळाडूंच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 26, 2024, 07:00 PM IST
ईशान किशन, केएस भरतच्या कारकिर्दीला ग्रहण, तर ऋषभ पंतचं पुनरागमन धोक्यात... कारण काय? title=

Wicketkeeper Batter Dhruv Jurel: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विशेष म्हणजे विराट कोहली, केएल राहुल, मोहम्मद शमी असे दिग्गज खेळाडू संघात नसताना केवळ युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) ही कामगिरी करुन दाखवली आहे. विशेषत: या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि आकाश दीप या खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. अलीकडच्या काळात टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यातल्या काही खेळाडूंनी संधीचं सोनं केलं तर काही खेळाडूंना संधी मिळूनही आपली जागा टिकवता आली नाही.

विकेटकिपिंगमध्ये चुरस
टीम इंडियात सर्वात जास्त चुरस आहे ती विकेटकिपींगसाठी. टीम इंडियात सध्या केएल राहुल, ऋषभ पंत, ईशान किशन, केएस भरत आणि आता ध्रुव जुरेल आहेत. या सर्वांनी गेल्या काही काळात टीम इंडियासाठी विकेटकिपिंग केली. पण आता काही जणांची जागात धोक्यात आली आहे. यापैकी ईशान किशन (Ishan Kishan) आणि केएस भरतच्या (KS Bharat) क्रिकेट कारकिर्दीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. तर ऋषभ पंतचं (Rishabh Pant) टीम इंडियातलं कमबॅक अजूनही तळ्यात-मळ्यात आहे.

केएस भरतची संधी गेली?
ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर टीम इंडियात कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकिपर म्हणून केएस बरताची वर्णी लागली. तब्बल सात कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली. पण त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. सात कसोटी सामन्यांच्या 12 इनिंगमध्ये त्याला फलंदाजी करण्याती संधी मिळाली. पण यात त्याला मोठी खेळी सोडा अर्धशतकही करता आलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात केएस भरतने  41, 28, 17, 6 धावा केल्या. केएस भरत कसोटी आणि लिस्ट-ए सामन्यांव्यतिरिक्त आयपीएलमध्ये खेळला आहे. 2022 च्या आयपीएलमध्ये भरतनं दमदार खेळी केली होती. या जोरावर त्याला टीम इंडियात जागा मिळाली. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो फ्लॉप ठरला.

ईशान किशन
25 वर्षांच्या ईशान किशनने स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून त्याने वैयक्तिक कारणाने माघार घेतली. पण याचं कारण त्याने बीसीसीआयलाही कळवलं नाही. त्यानंतर झारखंडसाठी तो रणजी ट्ऱॉफीही खेळला नाही. पण पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयपीएलसाठी तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर बडोद्यात सराव करताना दिसला. ईशान किशन विकेटकिपिंगबरोबरच संघात कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. पण आयपीएलला पहिलं प्राधान्य देत त्याने सरळ-सरळ बीसीसीआयला आव्हान दिलं आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर नाराज आहे. इतकंच काय तर त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

ऋषभ पंत
ऋषभ पंत दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. 2022 मध्ये झालेल्या कार अपघातात ऋषभ पंतच्या कारचा गंभीर अपघात झाला. यात सुदैवाने तो बचावला पण त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीतून पंत सध्या सावरतोय. पण तो टीम इंडियात कधीपर्यंत पुनरागमन करेलं, याबाबत अद्याप निश्चित काहीच सांगता येणार आहे. आयपीएल 2024 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्समधून खेळणार असल्यांच सांगितलं जातंय, पण तो विकेटकिपिंग करणार नसल्याचं संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. 

ध्रुव जुरेलचं नशीब चमकलं
या सर्वात नशीब चमकलंय ते ध्रुव जुरेलचं. सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या केएस भरतच्या जागीत राजकोट कसोटी सामन्या टीम इंडियाने ध्रुव जुरेलला (Dhruv Jurel) संधी दिली. पदार्पणणात जुरने 46 धावा केल्या. तर रांची कसोटीत 90 आणि नाबाद 39 धावा करत तो विजयाचा हिरो ठरला. टीम इंडियाला गरज असताना ध्रुव संयमीपणे खेळपट्टीवर उभा राहिला. रांची कसोटीत ध्रुव जुरेलच्या लढवय्या वृत्तीचं दर्शन झालं. या खेळीने ध्रुव जुरेलने टीम इंडियातलं आपलं स्थान निश्चित केलं आहे.

रोहित शर्माने केलं ध्रुवचं कौतुक
रांची कसोटी विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने युवा ध्रुव जुरेलचं कौतुक केलं. कसोटी क्रिकेटसाठी लागणार संयमीपणा आणि खेळपट्टीवर उभं राहण्याची जिगर ध्रुवमध्ये दिसते. पुढची पाच ते दहा वर्ष आपण त्याला खेळताना बघू शकतो असं रोहित शर्माने म्हटलंय.