ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर अज्ञाताची दगडफेक

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू प्रवास करत असलेल्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडीला आहे. हे खेळाडू सामना संपल्यानंतर आपल्या विश्रामगृहाकडे निघाले होते. दरम्यान, अज्ञात इसमाने या बसवर दगड भिरकावला. यात कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसाना झाले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 11, 2017, 08:49 AM IST
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या बसवर अज्ञाताची दगडफेक title=

गुवाहटी (आसाम) : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे खेळाडू प्रवास करत असलेल्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडीला आहे. हे खेळाडू सामना संपल्यानंतर आपल्या विश्रामगृहाकडे निघाले होते. दरम्यान, अज्ञात इसमाने या बसवर दगड भिरकावला. यात कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसाना झाले.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच याने ट्विट करून या घटनेची माहिती दिली. फिंच याने ट्विटसोबत या घटनेत नुकसान झालेल्या गाडीचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत गाडीची फुटलेली काच दिसते आहे. हा फोटो शेअर करताना फिंचने  “हॉटेलकडे जात असताना टीम बसच्या खिडकीवर दगड मारण्यात आला. हे खूपच भीतीदायक होतं”,असे म्हटले आहे.

तब्बल सात वर्षांनंतर गुवाहटीच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यात आला. त्यामुळे इथल्या चाहत्यांमध्ये सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. या आधी गुवाहटीच्या मैदानावर २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यात आला होता. दरम्यान, या प्रकाराबाबतत टीम इंडिया, बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या समान्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. तब्बल आठ गडी राखून ऑस्ट्रेलियाने दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारताकडून केवळ ११९ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. जे ऑस्ट्रेलियाच्या संघाने १४ षटकं आणि ३ चेंडूत पूर्ण केलं.

दरम्यान, मॉइजेस हेनरिकेज आणि ट्रॅविस हेड यांची भूमिका ऑस्ट्रेल्याच्या विजयासाठी महत्त्वाची राहीली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भिंत उभारली. हेनरिकेजने अर्धशतकी खेळी करत ४६ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६२ धावा ठोकल्या. तर, हेडनंही ३४ चेंडूत ५चौकार आणि एका षटकारासह चांगली खेळी केली. या विजयामुळे ऑस्ट्रेल्याने या मालिकेत भारतासोबत १-१ अशी बरोबरी साधली.

त्याआधी टीम इंडियाचा डाव अवघ्या 118 धावात कोसळला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनड्रॉफनं भेदक गोलंदाजी करताना केवळ 21 धावा देत टीम इंडियाच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं.  त्यानंतर अॅडम झंपानं त्याला सुरेख साथ देत 19 धावात दोन विकेट्स घेतल्या. तर नाथन कुल्टर नाईल, अॅन्ड्रू टाय आणि मार्कुस स्टॉयनिसनं प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतातर्फे केदार जाधवनं सर्वाधिक 27 धावांचं योगदान दिलं.