Video : बांगलादेश अन् श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये पुन्हा राडा; एका गैरसमजामुळे पेटला वाद

SL vs BAN : गतविजेत्या श्रीलंकेने 2023 आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला. श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या कामगिरीमुळे बांगलादेशचा संघ या सामन्यात 164 धावांवर गारद झाला.

आकाश नेटके | Updated: Sep 1, 2023, 12:28 PM IST
Video : बांगलादेश अन् श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये पुन्हा राडा; एका गैरसमजामुळे पेटला वाद title=

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 चा दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका (Ban vs SL) यांच्यात पल्लिकेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडी येथे खेळवला गेला. गतविजेत्या श्रीलंकेने आशिया चषक 2023 मधील आपल्या सामन्याची सुरुवात विजयाने केली आहे. ब गटातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. गेल्या काही काळापासून दोन्ही संघांमधल्या खेळाडूंमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळत आहे. एकमेकांना पराभूत करण्यासाठी दोन्ही संघ सातत्याने प्रयत्न करताना दिसत असतात. यामध्ये कधी खेळाडूंमध्ये हाणामारी देखील होते. गुरुवारी देखील त्याचाच प्रत्यय आला.

गुरुवारी दोन्ही संघ पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आल्यानंतर खेळाडूंमध्ये पुन्हा एकदा जोरदार वादावादी झाली. मात्र, अम्पायरने मध्यस्थी करुन तात्काळ प्रकरण शांत केले. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. मात्र यासगळ्या प्रकारानंतर खेळाडूंवर कारवाई काही कारवाई झाली की नाही याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. आशिया कप स्पर्धेत पुढे होणाऱ्या सामन्यांमध्ये हे संघ पुन्हा समोरासमोर आले तर वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

सामन्याच्या चौथ्या षटकात हा सगळा प्रकार घडला. ओव्हरचा शेवटचा चेंडू टाकल्यानंतर बांगलादेशचा गोलंदाज शरीफुल इस्लाम आणि श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस यांच्यात वाद झाला. प्रकरण तापत असल्याचे पाहून बाकीचे खेळाडू आणि अम्पायर मध्यस्थीसाठी आले. त्यांनी दोन्ही खेळाडूंना एकमेकांपासून दूर खेचले आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. माध्यमांच्या वृत्तानुसार, मेडीसला वाटले की शरीफुल इस्लामने गोलंदाजी करताना त्याला काहीतरी म्हटलं होतं. परंतु शेवटचा चेंडू टाकल्यानंतर शरीफुलने यष्टिरक्षकाला काही तरी सांगितले होते. याच गैरसमजातून दोघांमध्ये वाद झाला.

 

दरम्यान,  बांग्लादेशने टॉस जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बांगलादेशचा संपूर्ण संघ 42.4 षटकांत अवघ्या 164 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रीलंकेसाठी मथिसा पाथिरानाने 7.4 षटकात 32 धावा देत 4 बळी घेतले. तर महेश टेकशनाने 8 षटकांत 19 धावा देत 2 बळी मिळवले. धनंजय डी सिल्वा, डुनिथ वेलालेज आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. त्यानंतर श्रीलंकेसमोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य होते, जे संघाने 5 विकेट्स राखून पूर्ण केले. श्रीलंकेसाठी समरविक्रमाने 54 धावांची तर चरित असलंकाने 62 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार दासुन शनाकाने 14 धावा केल्या. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने 39 षटकात 5 विकेट गमावत 165 धावा केल्या.