BCCI अध्यक्ष कोणत्या मार्गाने करणार पाकिस्तानात एन्ट्री, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडणार

2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धा किंवा एशिया कप स्पर्धेत आमने सामने आले आहेत. आता मुंबई हल्ल्यानंतर पहिल्यांदा भारतीय क्रिकेटचं शिष्टमंडळ पाकिस्तानच्या जमिनीवर पाय ठेवणार आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 29, 2023, 10:05 PM IST
BCCI अध्यक्ष कोणत्या मार्गाने करणार पाकिस्तानात एन्ट्री, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडणार title=

Asia Cup 2023 : बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) एशिया कप 2023 स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तानात (Pakistan) जाणार आहेत. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारताचं शिष्टमंडळ भारत-पाक सीमा (India-Pakistan Border) ओलांडणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बीसीसीआयला (BCCI) पाकिस्तानमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद जाका अशरफ यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआय अध्यक्षांना सामने पाहण्यासाठी आणि एकत्र डिनर करण्याचं निमंत्रण दिलं होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajit Shukla) येत्या 4 सप्टेंबरला पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. पाकिस्तानत अधिकृत डिनर कार्यक्रमाला बिन्नी आणि शुक्ला उपस्थित राहाणार आहेत. याशिवाय 2 सामनेही पाहाणार आहेत. त्यानंतर सात सप्टेंबरला दोघंही मायदेशी परततील. आता सर्वात मोठा प्रश्न विचारला जात आहे रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला कोणत्या मार्गाने पाकिस्तानात प्रवेश करणार आहेत. 2 सप्टेंबरला श्रीलंकेत भारत आणि पाकिस्तानदरम्यान सामना होणार आहे. या सामन्याला रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला उपस्थित राहाणार आहेत. त्यानंतर चार सप्टेंबरला हे दोघंही पाकिस्तानसाठी रवाना होतील. 

पाकिस्तानला जाण्यापूर्वी रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला 2 सप्टेंबरला श्रीलंका दौरा करतील. त्यानंतर 4 सप्टेंबरला वाघा बॉर्डर मार्गे बीसीसीआयेच हे दोनही अधिकारी पाकिस्तानात प्रवेश करतील. 4 सप्टेंबरला लाहोमध्ये पीसीबीने आयोजित केलेल्या अधिकृत डिनर कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 5 सप्टेंबरला पाकिस्तान होणाऱ्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका सामन्याला ते हजेरी लावतील. तर 6 सप्टेंबरच्या सामन्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 7 सप्टेंबरला रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला भारतात परतणार आहेत. 

भारतीय क्रिकेट शिष्टमंडळाच्या पाकिस्तान दौऱ्यावर संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष असणार आहे. मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडले होते. यानंतर दोनही संघ केवळ आयसीसी स्पर्धा आणि एशिया कप स्पर्धेत आमने सामने आले आहेत. एशिया कप स्पर्धा पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती. पण बीसीसीआयने कठोर भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानने हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला. यानुसार टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे.

एशिया कप स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवले जाणार असून यातले 4 सामने पाकिस्तानात तर 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत.