'अजित दादांनी ऐकलं तर बरं नाहीतर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत'; असं का म्हणाले संजय राऊत?

'55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर किमान 40 -45 ला पिंपरी चिंचवडचा महापौर व्हायला हवा' असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Updated: Sep 26, 2021, 02:24 PM IST
'अजित दादांनी ऐकलं तर बरं नाहीतर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत'; असं का म्हणाले संजय राऊत? title=

भोसरी : 'शिवसेनेत पक्षामध्ये निष्टेला महत्व आहे. पद येतात जातात- सत्ता येते जाते. निष्टा कायम राहायला हवी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भोसरीतून शिवसनेचा एकही नगरसेवक निवडुन आलेला नाही याची आपल्याला खंत आहे. भोसरीने साथ दिली असती तर आढळराव पाटीलदेखील आज लोकसभेत असते. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. ते भोसरी (पिंपरी-चिंचवड)येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
 
'55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर किमान 40 -45 ला पिंपरी चिंचवडचा महापौर व्हायला हवा. महाविकास आघाडी आहे. सर्वांना थोडं थोडं मिळालं पाहिजे त्यात शिवसेनेलाही मिळालं पाहिजे. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असला पाहिजे असं आपण म्हटलं तर चूकलं काय? परंतु या दोन्ही शहरांमध्ये शिवसनेचा भगवा फडकला नाही याची खंत आहे. दोन्ही शहरांमध्ये उद्याचा भविष्यकाळ शिवसेनेचा असला पाहिजे. असंही संजय राऊत यांनी म्हटले.

'राज्यात सत्ता असली तरी या भागात आपलं ऐकत नाही असं म्हणतात. पण असं नाहीये. अजितदादा देखील मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. त्यामुळे आपण त्यांना सांगू. दादांनी ऐकले तर बरं होईल. नाहीतर आज मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेच आहेत.' अशी मिश्किल टिप्पणी देखील राऊत यांनी केली आणि ते पुढे म्हणाले, 'मुख्यंमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या दिल्लीवरही  आम्हाला राज्य करायचं आहे.'

पिंपरी चिंचवड शहरात आपला पाया ढेपाळला आहे. आपली संघटनात्मक बांधणी मजबूत झाली पाहिजे.  महाआघाडी होईल किंवा नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. आपण सर्व जागांसाठी जोरदार प्रयत्न करू. झाली आघाडी तर सोबत नाहीतर शिवाय अशी भूमिका आपली आहे. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू, परंतु स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार नाही हे लक्षात घ्यावं. असंही राऊत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले.