तटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम

कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2014, 03:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय. त्यामुळेच खेडमध्ये चक्क राष्ट्रवादी काँग्रेसची दोन कार्यालयं आजही उघडी आहेत. या दोन्ही कार्यालयांपैकी मुख्य संपर्क कार्यालय कोणतं असा प्रश्न पडल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन संपर्क कार्यालयांमुळे कार्यकर्ते मात्र गोंधळात पडलेत. विजय कदम हे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे गटाचे तर गणपत चिकणे प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव गटाचे मानले जातात.कदम यांनी कार्यालय बंद न करण्याचा निर्णय घेतलाय. पक्षाध्यश शरद पवार यांनी संपर्क कार्यालयाचं उदघाटन केलंय. त्यामुळे तीन बत्ती नाक्यावर असणारं कार्यालयचं राष्ट्रवादीचं मुख्य कार्यालय असल्याचं कदम सांगत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या उपस्थित कार्यालय सुरु झाल्यानं एसटी स्टँडसमोरील कार्यालय हेच मुख्य कार्यालय असल्याचं चिकणे सांगतात.
सुनील तटकरे गटाचे विजय कदम हे तालुकाध्यक्ष आहेत. तर भास्कर जाधव गटाचे गणपत चिकणे हे तालुकाध्यक्ष आहेत. दोन्ही कार्यालयाच्या गोंधळामुळे मात्र कार्यकर्ते संभ्रमात पडलेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील वादामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.