‘...तर टोल नाही, टोला देणार’

काहीही झालं तर टोल देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या कोल्हापूरकरांच्या संतापात आणखी भर पडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 13, 2012, 01:41 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर
काहीही झालं तर टोल देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या कोल्हापूरकरांच्या संतापात आणखी भर पडलीय. राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीनं वस्तुस्थितीची पाहणी न करता शहरातील रस्ते विकास प्रकल्पाला क्लिनचीट दिलीय.
रस्ते विकास प्रकल्पात कोल्हापूर शहरात ४९ किलोमीटरचे रस्ते आयआरबी कंपनीमार्फत करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या दर्जाबाबात कोल्हापूरकर नाराज आहेत. एव्हढच नाही तर त्यांनी आयआरबीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टोल देणारं नसल्याची भूमिका घेतलीय. अशातच शासनानं नियुक्त केलेल्या समितीनं रस्त्यांची पाहणी न करताच आयआरबीच्या कामाला क्लिनचीट दिल्यानं कोल्हापूरकरांच्या संतापात भर पडलीय. टोलविरोधी कृती समीतीनं तर टोल नाही, टोला देण्याची भूमिका घेतलीय.

शासनानं नियुक्त केलेल्या गुणवत्ता समितीमध्ये कोल्हापूरातील जेष्ठ आर्किटेक्ट प्रमोद बेरी यांचा समावेश आहे. त्यांनीही आयआरबीनं केलेल्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. कोल्हापूर शहारातील रस्ते दर्जाहीन तर आहेतच शिवाय या कामात नियम आणि अटींचं उल्लंघन करण्यात आलंय. त्यामुळं टोलविरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय जन आंदोलन उभं राहिलंय. त्यावर राज्य सरकारनं समितीचा तोडगा काढला असला तरी त्याच समितीच्या क्लिनचीटच्या निर्णयामुळं कोल्हापुरात आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.