भंडाऱ्यामध्ये अन्नपाण्यावाचून मायलेकींचा भूकबळी

प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडलीय. लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं मायलेकींचा तडफडून मृत्यू झालाय. अन्न सुरक्षेसा विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का हा प्रश्न कायम आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 16, 2013, 09:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भंडारा
प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडलीय. लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं मायलेकींचा तडफडून मृत्यू झालाय. अन्न सुरक्षेसा विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का हा प्रश्न कायम आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातली ही घटना प्रत्येकालाच मान खाली घालायला लावणारीय. लाखांदूर तालुक्यातल्या शेवंता हरी तोंडरे आणि गुणा हरी तोंडरे या मायलेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झालाय. 75 वर्षांतच्या शेवंताबाई आपल्या मुलीसह या घरात राहत होत्या. कुणी दिलं तर खायचे किंवा गावातून अन्न जमा करुन ते खाणे अशीच त्यांची दिनचर्या असायची. .मात्र गेल्या आठवड्याभरात या मायलेकींना कुणीही पाहिलं नव्हतं... काही दिवसांपासून त्यांच्या घराचं दारही बंद होतं आणि घरातून दुर्गंधी येत होती. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दोघींचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले... मायलेकी मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येतंय.. मात्र पोलिसांनी घर उघडल्यानंतर या मायलेकींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले... यावेळी तोंडरे यांच्या घरात अन्नाचा दाणाही आढळला नाही.
अन्न सुरक्षा विधेयकासाठी काँग्रेस पक्षानं आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावली असतानाच भंडा-यात मायलेकीचा भूकेनं तडफडून मृत्यू झालाय. देशातली जनता किती दिवस उपाशी झोपणार याचं उत्तर कोणत्या योजनेत नाही तर राजकीय इच्छाशक्तीत आहे. ही इच्छाशक्ती कधी जागृत होणार हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.