मनसेचा हा शेवटचा पराभव, आता पराभव नाही पाहायचा - राज ठाकरे

 मनसेच्या ११ व्या वर्धापनदिना दिवशी एवढचं सांगायला आलो आहे, लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका निवडणूक झाली.... हा पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव आहे. याच्यानंतर पराभव नाही पाहायचा... आता २०१९ च्या कामाला आत्तापासून लागा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 9, 2017, 09:59 PM IST
 मनसेचा हा शेवटचा पराभव, आता पराभव नाही पाहायचा - राज ठाकरे  title=

मुंबई :  मनसेच्या ११ व्या वर्धापनदिना दिवशी एवढचं सांगायला आलो आहे, लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका निवडणूक झाली.... हा पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव आहे. याच्यानंतर पराभव नाही पाहायचा... आता २०१९ च्या कामाला आत्तापासून लागा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. 

षण्मुखानंद सभागृहात आज मनसेचा ११ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे बोलत होते. 

आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता मी तुम्हाला भेटायला येईन. आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत, असे  राज ठाकरे यांनी सांगितले.

महापालिकेमध्ये मनसेला मोठा फटका बसला. नाशिकमध्ये  काम करूनही आम्ही हरलो आणि ज्या लोकांनी पैसा वाटला त्यांनाच जनतेनी जिंकवून दिले असे ते म्हणाले. 

गेली पाच वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जनतेसाठी भरपूर कामे केली. प्रत्येक वेळी मनसेचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामी आले परंतु त्यांना निवडून न देता केवळ ज्या लोकांनी पैसा वाटला त्या लोकांना जनतेनी निवडून दिले असे ते यावेळी म्हणाले. 

नाशिक शहराचा कायापालट केला. परंतु नाशिकच्या लोकांनी मात्र बाहेरुन आलेल्या लोकांना निवडून दिले. ही बाब अतिशय चुकीची आहे, असे ते म्हणाले. तुम्ही जो पायंडा पाडला आहे त्याने तुमचेच भविष्यात नुकसान होणार आहे असे ते म्हणाले. 

दरम्यान, मनसेला मतदान केलेल्यांचे राज ठाकरेंनी आभारही मानले आहेत. मनसेचे उमेदवार आणि मतदारांचे धन्यवाद, ज्यांनी मनसेला मतदान केलं नाही त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची हे शिकवलं, असंही वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.