यूनोला पत्र लिहून देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे

दादरी हत्याप्रकरणी यूनोला पत्र लिहिणाऱ्या आझम खान यांच्यावर शिवसेनेनं जहाल टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला, या शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं.

Updated: Oct 7, 2015, 11:14 AM IST
यूनोला पत्र लिहून देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे title=

मुंबई: दादरी हत्याप्रकरणी यूनोला पत्र लिहिणाऱ्या आझम खान यांच्यावर शिवसेनेनं जहाल टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला, या शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं.

दादरी हत्याप्रकरणानंतर हिंदुस्थानातील मुसलमानांच्या दुर्दशेकडे 'युनो'नं( संयुक्त राष्ट्र संघ) लक्ष घालावं अशी मागणी करत देशाची इज्जत आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर नेणारे आझम खान हे एकप्रकारे देशद्रोही असून मुलायम सिंग यादव यांच्या धमन्यांत कणभर जरी राष्ट्रभक्ती असेल तर त्यांनी आझम खानची हकालपट्टी केली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आझम खानवर टीका केली आहे. 

आणखी वाचा - अखलाकनं स्वत:च्या बचावासाठी अखेरचा फोन केला हिंदू मित्राला

आझम खानला देशातील कुठल्याही घटानात्मक पदावर राहण्याचा अधिकार नसून निवडणूक आयोगानं त्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावं अशी मागणीही उद्धव यांनी केली आहे. दादरी इथं एका माणसाच्या मृत्यूनंतर सर्व  बेगडी निधर्मी पक्ष आणि पुढारी नक्राश्रू ढाळत आहेत, मात्र मक्केतील चेंगराचेंगरीत हजारांवर मुस्लिम चिरडून मेले, त्यात शंभरेक भारतीयांचा समावेश आहे, पण त्या घटनेबाबत एकाही राजकीय पुढाऱ्यानं साधा उसासाही सोडला नाही. कारण त्यांच्या मरणाचा 'व्होट बँकेशी' संबंध नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या सोबत

दादरी प्रकरणावरून भाजपावर होणाऱ्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. ' या सर्व प्रकरणात भाजपाला हिंदुत्ववादी म्हणून झोडपणे सर्वार्थानं चूक आहे. सत्तेत असलेला भाजप शत-प्रतिशत निधर्मी म्हणूनच कारभार करीत आहे. मुसलमानांनी अर्ध्या रात्री दरवाजा ठोठवावा, आपण त्यांच्या मदतीस धावून जाऊ, असं वचन पंतप्रधान मोदी यांनीच दिलं आहे. त्यामुळं अशा ‘निधर्मी’राजवटीत मुसलमानांवर अत्याचार होतात म्हणून थेट ‘युनो’कडे धाव घेणं हा देशाचा आणि पंतप्रधान मोदींचा अपमान आहे' असं त्यांनी लेखात म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारवरही टीका

या लेखात उद्धव यांनी उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली आहे.  जिथं ही घटना घडली ती दादरी ही उत्तर प्रदेशात येते, त्यामुळं उत्तर प्रदेशचे सरकार निकामी आणि षंढ आहे असं म्हणावं लागेल, असं कुचकामी सरकार असल्यामुळं उत्तर प्रदेशची कायदा-सुव्यवस्था ढासळून तिथं अराजक निर्माण झालं आहे. त्यातूनच दादरीसारख्या घटना घडवून दोन धर्मांत तणाव निर्माण होत आहे. दादरी प्रकरण इतके झोंबले असेल तर आझम खान यांनी प्रथम मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता आणि मुख्यमंत्री अखिलेश यादवांचा राजीनामा मागायला हवा, अशी मागणी उद्धव यांनी केली आहे.  

आणखी वाचा - दादरी दुर्घटना : अरविंद केजरीवाल यांना रोखलं, मोदींचे मौन का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.