पोलिसांना मिळाली होती हिंसेची सूचना

मुंबई हिंसाचाराबद्दल आता एक धक्कादायक माहिती पुढे येतेय. आसाम मुद्यावरून मुंबईच्या कायदा आणि व्यवस्था बिघडण्याची सूचना अगोदरच मिळाली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 13, 2012, 10:39 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई हिंसाचाराबद्दल आता एक धक्कादायक माहिती पुढे येतेय. आसाम मुद्यावरून मुंबईच्या कायदा आणि व्यवस्था बिघडण्याची सूचना अगोदरच मिळाली होती, असं एका अहवालात म्हटलं गेलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना आसामा हिंसेच्या पार्श्वभूमीवर अगोदरच सूचना मिळाल्या होत्या. या मुद्यावरून मुंबईतही हिंसाचार घडू शकतो, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली होती. पण, तरिही या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात मुंबई पोलिसांना अपयश आलं.
शनिवारी सीएसटी स्थानकाजवळ घडलेल्या हिंसाचारात दोघांचा बळी गेला होता. या हिंसाचाराची चौकशी सुरू झालीय. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी सीसीटीव्ही रेकॉर्डसची मदत घेण्यात येतेय.
आसाममध्ये सुरु असलेल्या जातीय हिंसाचाराच्या विरोधात आझाद मैदानात मुस्लिम समुदायानं आंदोलन पुकारलं होतं. यावेळी, आयोजकांनी आसाम आणि म्यानमारमधल्या मुसलमान हल्ल्यांची निंदा केली. यावेळी मुसलमानांवर झालेले अन्याय प्रकाशझोतात आणण्यासाठी मीडियालाही साद घातली गेली. पण, काही भडकाऊ भाषणांमुळे हिंसाचाराला खतपाणी मिळालं. भाषणानंतर ताबडतोब काही युवकांनी पत्रकार तसंच पोलिसांवर हल्ला केला. सार्वजनिक वाहनंही यावेळी टार्गेट करण्यात आली.