सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी

बांधकाम क्षेत्राला निराश करणारी पण सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी.

Updated: Feb 21, 2016, 07:33 PM IST
सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी title=

मुंबई : बांधकाम क्षेत्राला निराश करणारी पण सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी आहे. कारण मुंबई सारख्या शहरात घरांच्या विक्रीत १७ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे घरांच्या किमती आणखी खाली जाण्याची दाट शक्यता वाढली आहे.

बिल्डरांसाठी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दिल्ली, बंगळुरू, चेन्नईचं नाही तर मुंबईतही घरांची विक्री जवळ-जवळ ठप्प झाली आहे.

सध्या घरांच्या असलेल्या किमती या सर्वसामान्यांच्याच नाही, तर त्यावर असलेल्या एका आर्थिक वर्गाच्याही आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

चालू आर्थिक वर्षात देशात घरांच्या विक्रीचा ट्रेंड स्पष्ट करणारी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. दसरा-दिवाळीत निर्माण झालेल्या तेजीचा वेग मंदावला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, रिकाम्या पडून असलेल्या घरांची विक्री मार्गी लागावी, यासाठी बिल्डरांनी अनेक अभिनव आणि आकर्षक योजनांची बरसात केली. 

घराचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांची स्वप्नपूर्ती सहजतेने पूर्ण व्हावी, यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतरही, याचा फारसा सकारात्मक परिणाम घरांच्या विक्रीवर झालेला दिसत नसल्याचं सांगण्यात येत आहे.

हा वेग आताच नाही तर मागील पाच वर्षापासून मंदावत आहे, मात्र यावेळेस या मंदीचा वेग आणखी वाढला आहे.

एका आंतरराष्ट्रीय विश्लेषण संघटनेने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ही संघटना गृहनिर्माण क्षेत्रात काम करते. देशातील गृहविक्रीची मजेदार माहिती यामुळे समोर आली आहे. 

या निरीक्षणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे, अर्थात हे धक्कादायक वास्तव बिल्डरांसाठी आहे. देशातील मेट्रो शहरं मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू या ठिकाणी घराची विक्री ठप्पच झाली आहे.

या शहरांतील बहुतांश विकासकांनी फारसे नवे प्रकल्प सुरू केलेले नाहीत. तसेच बांधून तयार असलेल्या प्रकल्पांतील घरांच्या विक्रीसाठी प्रयत्नशील आहे. 

देशातील प्रमुख शहरांतून गृहविक्री मंदावण्याचे प्रमुख कारण म्हणजे, या बिल्डरांनी उभारलेल्या प्रकल्पातील घरांचे आकारमान हा कळीचा मुद्दा आहे. किमान टू बीचके आणि त्यावरील आकारमानाची अशी ही घरे आहेत. मुंबईत घरांच्या किमती या किमान ७० लाख, ते ६ कोटी रुपयांच्या दरम्यान आहेत.