मुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता

मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 12, 2013, 04:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.
तर पवाई तलावात ओमकार गुरव हा चिमुकला वाहून गेला असल्याची माहिती आहे. या मुलाला शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच मुलुंड येथील गवणी पाडा येथे खड्यात साचलेल्या पाण्यात एक तरूण पडला असून त्याला खड्ड्यातून बाहेर काढण्याच कार्य सुरू आहे.
मुसळधार पावसाने मुंबईकरांना सळो की पळो करून सोडलेय. अनेक ठिकणी पाणी साचल्याने मुंबईतील बेस्ट वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. त्यामुळे मध्य रेल्वेची स्लो वाहतूक बंद झालेय. तर दादर, हिंदमाता, एलफिस्टन(वेस्ट) , सायन रोड २४, भांडूप (वेस्ट) या भागांत पाणी साचल्याने रस्ता वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
ठाण्यात सकाळपासून पावसाचा कहर केला आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचलेय. रूळ पाण्याखाली असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर धीम्या मार्गावरील वाहतूक गेल्या दोन तासांपासून ठप्प आहे. ही वाहतूक फास्ट ट्रकवर वळविण्यात आल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही विलंब होत आहे. एकाच ट्रकवर फास्ट आणि स्लो रेल्वे धावत असल्याने मुंबई लोकलच्या गाड्या उशीराने धावत आहेत.
मुलुंड, ठाणे, आनंदनगर चेक नाक्याजवळ गुडघाभर पाणी आहे. मुंब्रा ते ठाणे स्थानकादरम्यान ठिकठिकाणी पाणी भरुन रुळ पाण्याखाली गेले. त्यामुळे आता ठाणे ते मुंब्रादरम्यान धिम्या मार्गावरची पूर्ण वाहतूकच बंद करावी लागली असून जलद मार्गावर ताण आल्याने गाड्या २५ ते ३० मिनीटे उशीराने धावत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार अनेक लोकल खोळंबून पडल्या असून मुंबईकडे येणाऱ्या व उपनगराकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत.
पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला असून गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा रेल्वेस्थानकाजवळ ट्रॅकवर पाणी भरले असून विरारकडे जाणाऱ्या व विरारहून येणाऱ्या गाड्या अडकून पडल्या आहेत.
दरम्यान, दक्षिण गुजरातमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूकही विस्कळीत झाली असून राजधानी एक्स्प्रेस सुरत स्थानकात अडकून पडली आहे. पावासाच्या दरम्यान चौपाटी आणि समुद्र किनाऱ्यांवर जाणे शक्य तो टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.