शेतकऱ्यांना, ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका

कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी आता सरकारनं जोरदार उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Updated: Jul 13, 2016, 09:33 AM IST
शेतकऱ्यांना, ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका title=

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी आता सरकारनं जोरदार उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मुंबईत ग्राहकांना स्वस्त भाजीपाला मिळावा यासाठी मुंबईच्या डायरेक्ट मार्केटिंग कंपनी मार्फत शेतमाल आणण्याची व्यवस्था केली आहे. या केंद्रांवर थेट शेतकरी आपला माल ग्राहकांना विकू शकतील. यामुळं ग्राहक आणि शेतकऱ्यांना लुटणारी साखळी गळून पडणार आहे. 

फार्मर-प्रोड्युसर्स कंपनीच्या माध्यमातून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आहार संस्थेचीही नाशिकच्या उत्पादकांशी बोलणी सुरु आहेत. उत्पादक माल थेट या संस्थेमार्फत हॉटेल्सपर्यंत पोहचवतील. त्यामुळे आता हा प्रयोग यशस्वी झाला तर व्य़ापाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे.

पर्यायी विक्री केंद्र 

मुंबईत घाटकोपर, कांदिवली, माहीम, बोरिवली, अंधेरी लोखंडवाला या ठिकाणी पर्यायी मालविक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मुंबई आणि पुण्यात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले आहेत.

मदतीसाठी संपर्क साधा

मदतीसाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. 

०२२-२२८३०४३० - पणन विभाग, मंत्रालय, मुंबई

आणि 

०२०-२४५२८१०० - पणन संचालक, पुणे