मध्य रेल्वे विस्कळीत, दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक

मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने या प्रवाशांना फटका बसल्याने दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीसही दाखल झालेत.

Updated: Jun 21, 2016, 01:16 PM IST
मध्य रेल्वे विस्कळीत, दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक title=

ठाणे : मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने या प्रवाशांना फटका बसल्याने दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीसही दाखल झालेत.

रात्रभर पडलेल्या पावसामुळे हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल उशिराने धावत असल्याने कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल होता आहे. गाड्या उशिराने असल्याने रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. अनेकांना गाडीत चढण्यात मिळत नाही. अशाच प्रकार दिवा रेल्वे स्थानकावर झाला. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी लोकलला टार्गेट केलेय. या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेय.

मध्य रेल्ववर झालेल्या रेल्वेच्या खोळंब्याला हिंसक वळणही लागलंय. दिवा स्थानकात संतप्त प्रवाशांनी लोकलवर दगडफेक केली.  सकाळापासून ट्रेनच्या खोळंब्यामुळे दिवा स्टेशनवर तूफान गर्दी झाली.  त्यातच संतप्त प्रवासी ट्रॅकवर उतरले आणि दगडफेक केली. ट्रेनमधल्या प्रवाशांनी प्रसंगावधान राखून पटापट खिडकीच्याय काचा बंद केल्या. टिटवाळ्याहून येणारी फास्ट थांबण्यात यावी अशी प्रवशांची मागणी होती. स्लो मार्गावर सीएसटीकडे दिवा स्टेशनवर येणाऱ्या लोकल  भरुन येत होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या संतापात वाढ झाली. 

मध्य रेल्वेची वाहतूक अजुनही विस्कळीत आहे. विद्याविहार, ठाणे, विक्रोळी, भांडूप स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसन येत आहे. पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली तरी ती रुळावर येण्यास उशिर होत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीतच आहे. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे भायखळ्यापुढे लोकलच्या रांगा दिसून येत आहेत.

रात्रभर मुसळधार पाऊस पडलेला असला, तरी पहाटेपासून पाऊसाचा जोर असरल्यानं उपनगरातले प्रामुख्यानं कल्याण डोंबिवलीतले प्रवासी कामावर निघाले. पण स्टेशनवर आल्यावर मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या गाड्याच नसल्यानं स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे स्टेशन प्रवाशांच्या अशरशः पूर आला...अनेक ठिकाणी लोकांना दोन दोन तास गाड्यांची वाट बघावी लागली. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं गाड्यांची वाहतूक उशिरानं होत असल्याच्या घोषणा होत होत्या...पण पाऊस थांबला तरी पाणी ओसरत का नाही...असा प्रश्न प्रवाशांना सातवत होता. 

मुंबईत रेल्वे ट्रकवर पाणी

मुंबईत पावसानं जोरदार कमबॅक केलंय. आज सकाळपासून कुर्ल्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे मात्र मुंबईतील सखल भागात पाणी भरलं. कुर्ला लोकमान्य टिळक नगर रोडला तर नदीचं स्वरूप आलं होतं. शाळेत जाणारे विध्यार्थी तसंच बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांना या संकटाचा सामना करावा लागला. रेल्वे कॉलनीत मोठ्या प्रमाणात पाणी भरले. नालेसफाई योग्य झाली असती तर पाणी भरले नसते असे रहिवाशांचं म्हणणं आहे.