भाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.

Updated: Oct 20, 2014, 04:27 PM IST
भाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ! title=

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेली ससेहोलपट आणि वाताहातीनंतर खासदार राजू शेट्टी, खासदार रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे या नेत्यांवर पुढील पाच वर्षें हात चोळत बसण्याची वेळ आता आली आहे. 

खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपच्या साथीनं पश्चिआम महाराष्ट्रात १३ जागा लढवल्या, मात्र शेट्टी यांचा एकसुद्धा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. तर खासदार रामदास आठवले यांच्या रिपाइंला खर्‍या अर्थानं पिंपरी, विक्रोळी, चेंबूर या तीन जागा भाजपकडून मिळाल्या होत्या. त्या जागांवरील चंद्रकांता सोनकांबळे, विवेक पंडीत, दीपक निकाळजे हे रिपब्लिकन उमेदवार पराभूत झाले आहेत.

धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं भाजपच्या साथीनं दौंड, अहमदपूर, श्रीगोंदा, माण, भूम-परांडा या पाच जागा लढवल्या. त्यातील दौंड इथल्या ‘रासप’चे उमेदवार राहुल कुल हे विजयी झाले आहेत, पण त्यांच्या विजयाचं श्रेय भाजप-रासपा यांच्याऐवजी त्यांच्या कुटुंबाला असलेल्या राजकीय पार्श्वरभूमीला दिलं जात आहे. राहुल कुल यांची आई आणि वडीलही माजी आमदार आहेत. उरलेल्या चार जागांवर रासपाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

विनायक मेटे पराभूत

‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीआधीच मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून ‘महायुती’ची कास धरली होती. विधानसभा निवडणुकीत ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत जाऊन त्यांनी बीडमधून निवडणूक लढवली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथं घेतलेली सभाही मेटे यांचा पराभव रोखू शकली नाही. त्यांना राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी धूळ चारली आहे. तसंच शिवसंग्रामच्या त्यांच्यासहित पाचही उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाचे कटू घोट रिचवावे लागले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.