ब्रिटन युरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यानं भारतावर काय परिणाम होणार?

ब्रिटनमध्ये झालेल्या जनमत चाचणीनंतर ब्रिटनच्या नागरिकांनी युरोपियन यूनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jun 24, 2016, 04:49 PM IST
ब्रिटन युरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यानं भारतावर काय परिणाम होणार? title=

लंडन : ब्रिटनमध्ये झालेल्या जनमत चाचणीनंतर ब्रिटनच्या नागरिकांनी युरोपियन यूनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ब्रिटन आता युरो झोनचा हिस्सा राहणार नाही. अर्थतज्ज्ञांच्या मते ब्रिटन युरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्याचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. या निर्णय अजून अमलातही आलेला नसताना मुंबई शेअर मार्केट 900 पॉईंट्सनी पडलं, तर रुपयाही डॉलरच्या तुलनेत 78 पैसे पडला.

युरोपियन यूनियनमधून बाहेर पडण्याच्या या निर्णयाचा भारतावरही परिणाम होणार आहे.

1 युरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यामुळे रुपयाच्या तुलनेत पाऊंड पडण्याची शक्यता आहे. पाऊंड पडल्यामुळे डॉलरचा भाव वधारेल आणि डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा एकदा आपटेल.

2 सध्या भारत आयात करत असेललं इंधन डॉलरमध्ये घेतं. डॉलरचा भाव वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भावही वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम भारतातली महागाई वाढण्यावर होईल.

3 पाऊंड पडल्यामुळे डॉलरची मागणी वाढेल, यामुळे आयात करण्यात येणाऱ्या गोष्टींच्या किमतीवर परिणाम होईल. डॉलरचा मूल्य वाढल्यामुळे आयात महाग होईल.

4 डॉलर महाग झाल्यामुळे परदेशातून येणारं सोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग व्हायची शक्यता आहे.

5 ब्रिटन युरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यानंतर आता युरोपातले दुसरे देशही अशीच मागणी करण्याची शक्यता आहे. तसं झालं तर पाऊंडची परिस्थिती आणखी खराब होईल आणि डॉलरची मागणी आणखी वाढेल. यामुळे या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांनाही याचं मोठं नुकसान होईल.

6 ब्रिटनच्या या निर्णयामुळे भारताला ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करणं सोपं होणार आहे. भारताच्या अन्य देशांबरोबरच्या द्विपक्षीय व्यापारामध्ये ब्रिटन १२ व्या क्रमांकावर आहे. ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये भारत तिसरा मोठा गुंतवणूकदार आहे.

7 युरोपियन यूनियनमध्ये असलेल्या देशांबरोबर व्यापारी संबंध असलेल्या देशांवर या निर्णयाचा वाईट परिणाम होणार आहे. भारतासाठी युरोपियन यूनियनमधले देश हे एक्सपोर्टसाठीचं सगळ्यात मोठं मार्केट आहे.

8 भारतीय आयटी सेक्टरची 6 ते 18 टक्के कमाई ब्रिटनमधून होते. भारतीय कंपन्यांचा युरोपमध्ये जायचा रस्ता ब्रिटनपासून सुरु होतो. आता ब्रिटन युरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यामुळे या कंपन्यांना नवे करार करावे लागणार आहेत. यामुळे कंपन्यांचा खर्चही वाढणार आहे.

9 ब्रिटन युरोपातून वेगळा होणार असल्यानं जगभरातल्या शेअर मार्केटवर अनिश्चिततेचं सावट आहे. याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही होणार आहे.