फेसबुक मोक्याचं, SMS साठी २१वं वरीस धोक्याचं...

१६ वरीस धोक्याचं.. म्हणलो तरी आता २१ वं वरीस धोक्याचं असचं म्हणायची वेळ एसएमएस सर्व्हिसवर आली आहे.

Updated: Dec 4, 2012, 11:31 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
१६ वरीस धोक्याचं.. म्हणलो तरी आता २१ वं वरीस धोक्याचं असचं म्हणायची वेळ एसएमएस सर्व्हिसवर आली आहे. फेसबुक, वॉटस-अप, बीबीएम यासारख्या अनेक नव्या अॅपमुळे एसएमएस करण्याची तितकीशी गरज वाटेनाशी झाली आहे. एसएमएस सर्व्हिसला २१ वे वर्ष लागले असतानाच ‘एसएमएस’च्या संख्येत जागतिक स्तरावर घट झाल्याचे समोर आले आहे.
१९९८ साली ब्रिटनमधील चार प्रमुख कंपन्यांनी ‘पे ऍज यू गो’ तत्त्वावर एसएमएस सेवा सुरू केली होती. या सेवेचा जगातील चार अब्ज लोक लाभ घेत आहेत. पण सध्या इन्स्टंट मेसेजिंग व सोशल साईटवरून चॅटिंग करणे अधिक सोपे झाल्याने २० वर्षांत प्रथमच ‘एसएमएस’ संख्येत घट नोंदविली गेली आहे.
आयटी क्षेत्रातील जाणकारांच्या मते आधुनिक तंत्रज्ञानात इन्स्टंट मेसेजिंगला ग्राहकांचा वाढणारा प्रतिसाद पाहून अनेक कंपन्या नवनवीन माध्यमे व तंत्रज्ञान समोर आणत आहेत. परिणामी ‘एसएमएस’च्या संख्येत जागतिक स्तरावर घट झाली आहे.
एसएमएसपेक्षा कमी वेळेत कमी पैशात मेसेज पाठवणार्‍या साईटला ग्राहकांनी पसंती दिली. यामुळे २१वा वाढदिवस साजरा करणार्‍या एसएमएस सर्व्हिसला उतरती कळा लागली आहे. लक्षणीय घट गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये ३९.७ अब्ज एसएमएस मोबाईलधारकांकडून पाठविण्यात आले. आता हा आकडा ३८.५ अब्जावर आला आहे.