‘…मोदी तर कालचा पोरगा’

लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला आणि नरेंद्र मोदींना दिलेला कौल पचवण्यासाठी अजूनही काही नेत्यांना जड जातंय. कांग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना ‘कालचा पोरगा’ ठरवलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 12, 2014, 12:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला आणि नरेंद्र मोदींना दिलेला कौल पचवण्यासाठी अजूनही काही नेत्यांना जड जातंय. कांग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांना ‘कालचा पोरगा’ ठरवलंय.
बुधवारी, संसदेत पहिल्यांदाच केलेल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदींनी कौरव-पांडवांचा उल्लेख करत माजी सरकारला चिमटा काढला होता. त्यावरच, मणिशंकर अय्यर यांनी ‘मोदी तर कालचा पोरगा आहे... जोशात काहीही बोलून जातो... त्याला अजून समज आलेली नाही’ असं वक्तव्य केलंय.
आत्ताही पांडवांचाच विजय व्हावा, असं भाव जनतेच्या मनात असतो, अशा आशयाचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषणादरम्यान केलं होतं. यापूर्वी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसला पांडव म्हणवून घेतलं होतं. लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पक्षाच्या मिळालेल्या कमी जागांच्या संदर्भात बोलताना, ‘पांडवदेखील पाचच होते…’ असं म्हटलं होतं. सोबतच भाजपचा उल्लेख टाळत ‘कौरवदेखील संख्येत पांडवांपेक्षा अधिक होते पण जिंकले मात्र पांडवच’ असं वक्तव्य केलं होतं. यालाच नरेंद्र मोदी यांनी ‘पांडवांचा विजयी भाव अजूनपर्यंत गेलेला नाही... महाभारतात दुर्योधनाला कुणीतरी विचारलं की त्याला धर्म-अधर्म, सत्य-असत्याबद्दल काही माहित आहे की नाही... तेव्हा त्याला दुर्योधनानं उत्तर दिलं की धर्म-अधर्म काय आहे आणि सत्य काय आहे हे आपल्याला माहिती आहे पण त्यानुसार आचरण करणं मात्र आपल्या डीएनएमध्ये नाही’ असं उत्तर दिलं. ‘कौरव आणि पांडवांची वेळ आता समाप्त झालीय आणि सरकारला सगळ्याच लोकांना बरोबर घेऊन चालायचंय’ अशी पुस्तीही मोदींनी यावेळी जोडली होती.
मणिशंकर अय्यर यांनी असं बरळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही... या आधीही त्यांनी मोदींना ‘चहावाला’ म्हणत हिणवलं होतं... यामुळे मोदी लोकांच्या मनातून उतरले नाहीत मात्र त्यांचं वजन आणखीनच वाढलं आणि त्याचा फायदा भाजपनं पुरेपूर करून घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.