आता आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे गुन्हा नाही, कलम 309 संपणार

आत्महत्येचा प्रयत्न करणं हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणारं भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

Updated: Dec 10, 2014, 05:28 PM IST
आता आत्महत्येचा प्रयत्न म्हणजे गुन्हा नाही, कलम 309 संपणार title=

नवी दिल्ली: आत्महत्येचा प्रयत्न करणं हा आता गुन्हा ठरणार नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणारं भारतीय दंड विधानातील कलम ३०९ वगळण्यात येईल, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

गृह राज्य मंत्री किरण रिजीजू यांनी ऑगस्टमध्ये लोकसभेत उत्तर देताना कायदा समितीनं आत्महत्येचा प्रयत्न करणं हा गुन्हा ठरवणारा कलम वगळण्याची शिफारस केल्याचं म्हटलं होतं. यानंतर केंद्र सरकारनं हा कायदा रद्द करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरु केले. १८ राज्य आणि ४ केंद्र शासित प्रदेशांनी हा कायदा रद्द करण्यास पाठिंबा दिल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं. आता संसदेतील दोन्ही सभागृहासमोर हा प्रस्ताव मांडला जाणार असून दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतरच हा कायदा रद्द होऊ शकेल. यासाठी किती अवधी लागेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आयपीसीतील कलम ३०९ अंतगर्त आत्महत्येचा प्रयत्न करणं हा गुन्हा असून यात दोषी आढळल्यास एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती आधीच मानसिकदृष्ट्या खचलेली असल्यानं ते आत्महत्येचा पर्याय निवडतात. आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यास त्यांना शिक्षा ठोठावून त्यांच्यावर अन्यायच केला जातो आणि म्हणूनच हे कलमच रद्द करावं, अशी मागणी अनेक सामाजिक संघटना करत होत्या.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.