गांधी बंधू, स्मृती इराणी, राबडी देवी यांचं भवितव्य मतपेटीत बंद

लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील 64 जागांसाठीच मतदान पूर्ण. गांधी बंधू, स्मृती इराणी, राबडी देवी यांसह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 7, 2014, 07:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अमेठी
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील 64 जागांसाठीच मतदान पूर्ण. गांधी बंधू, स्मृती इराणी, राबडी देवी यांसह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद.
देशात आठव्या टप्प्यातील मतदान पार पडलंय. सात राज्यांमधील 64 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. चार वाजेपर्यंत सर्वात जास्त 62 टक्के मतदान आंध्र प्रदेशात झालं. उत्तर प्रदेशात 44 टक्के तर बिहारमध्ये 51 टक्के मतदान झालंय़. हिमाचलमध्ये 53 टक्के तर जम्मू-काश्मिरमध्ये 35 टक्के मतदान झालंय.
आठव्या टप्प्यात गांधी बंधुंसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अमेठीतून राहुल गांधी मैदानात असून त्यांना भाजपच्या स्मृती इराणींचे आव्हान आहे. तर सुलतानपूरमधून वरुण गांधी भाजपकडून रणांगणात आहेत. तर बिहारमध्ये लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
गेल्यावेळी पराभूत झालेले एलजेपीचे अध्यक्ष रामविलास पासवान हाजीपूर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत. यासह भाजपचे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी सी खंडुरी आणि रमेशचंद्र पोखरियाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर सीमांध्रमधून काँग्रेसकडून केंद्रीय मनुष्य बळ विकासमंत्री पल्लम राजू हेदेखील निवडणुकीच्या मैदानात आहेत.
नरेंद्र मोदी यांनी आज बिहार येथील सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी दिलेल्या, काम खालच्या दर्जाचं असतं, जात नाही या वक्तव्यावर प्रतिक्रिया दीली. यूपीए सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवत त्याचा हिशोब राहुल गांधीकडून मागितला आहे. तसंच अमेठीची सीट वाचवण्याकरता राहुल गांधींना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असं वक्तव्यही यावेळी केलं.
अमेठीमधल्या एका मतदानकेंद्रावरच्या फलकावर भाजपाचं निवडणूक चिन्हाचं चित्र काढण्यात आलं होतं. अमेठीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांनी त्याला आक्षेप घेतला. याबाबत त्यांनी निवडणूक अधिका-यांकडे तक्रारही केलीय. अमेठीत राहुल गांधींची लढत भाजपच्या स्मृती इराणी आणि आम आदमी पक्षाच्या कुमार विश्वास यांच्याशी होतीय.
राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केल्यानंतर भाजपनंही राहुल गांधींवर टीका केलीय. राहुल गांधींना अमेठीमध्ये आणि काँग्रेसला देशात पराभवाला सामोर जाव लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.