निवडणूक आयोगानं अडवला काळ्या पैशांचा, मद्याचा पूर

निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप ही काही आता नवीन किंवा लपून राहिलेली गोष्ट उरली नाही. पण, यंदाच्या निवडणुकीत मात्र तुमचे डोळे पांढरे पडतील ते निवडणूक आयोगानं अशाच धुंडाळून काढलेल्या काळ्या पैशांचा आकडा ऐकल्यावर....

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 23, 2014, 05:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप ही काही आता नवीन किंवा लपून राहिलेली गोष्ट उरली नाही. पण, यंदाच्या निवडणुकीत मात्र तुमचे डोळे पांढरे पडतील ते निवडणूक आयोगानं अशाच धुंडाळून काढलेल्या काळ्या पैशांचा आकडा ऐकल्यावर....
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काळ्या पैशांचा होणारा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत देशात २४० कोटी रुपयांची रोकड, कोट्यवधी लिटर दारू आणि अंमली पदार्थ जप्त केलेत. छुप्या पद्धतीनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून हे फंडे वापरले गेलेल्या या कारवाईत समोर आलंय.
निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तपशीलानुसार, निवडणुकांदरम्यान अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशातून १०२ कोटी, तमिळनाडूमधून ३९ कोटी तर कर्नाटकातून २०.५३ कोटी रुपये रक्कम जप्त करण्यात आल्याचं समजतंय. विविध खात्यांच्या शोधपथकांनी सुमारे एक कोटी ३२ लाख लिटर दारू आणि १०४ किलोग्रॅम हेरॉइन जप्त केल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलंय.

पाचव्या टप्प्यातील मतदान १७ एप्रिल रोजी संपले तेव्हा निवडणूक आयोगाने देशभरातून २१६ कोटी रुपये रोकड आणि एक कोटी लिटर दारू जप्त केली होती. तोपर्यंत आंध्र प्रदेशातून ९२ कोटी, तर महाराष्ट्रातून २४ कोटी रुपये रक्कम जप्त करण्यात आली होती. नऊ टप्प्यांतील या निवडणुका ७ एप्रिल सुरू झाल्या असून, १२ मे रोजी संपणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.