मुंबईतील प्रवास... ट्राम ते मोनो रेल

मुंबईत मोनो आल्यानं मुंबईच्या वेगाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या..... आणि गेली अनेक वर्ष झरझर मागे गेली.... अगदी थेट अठराव्या शतकात.... त्याकाळी ट्रामशिवाय मुंबईकरांचं पान हलत नव्हतं.... मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची ही ट्राम चक्क नव्वद वर्षं मुंबईकरांसाठी धावत होती...आजही जुने मुंबईकर त्या ट्रामच्या आठवणींत रंगून जातात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 1, 2014, 10:00 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई ,
मुंबईत मोनो आल्यानं मुंबईच्या वेगाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या..... आणि गेली अनेक वर्ष झरझर मागे गेली.... अगदी थेट अठराव्या शतकात.... त्याकाळी ट्रामशिवाय मुंबईकरांचं पान हलत नव्हतं.... मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची ही ट्राम चक्क नव्वद वर्षं मुंबईकरांसाठी धावत होती...आजही जुने मुंबईकर त्या ट्रामच्या आठवणींत रंगून जातात.
मुंबईत लोहमार्ग टाकण्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर १८५० रोजी सायनमध्ये नामदार विलोघबी यांच्या हस्ते करण्यात आली. प्रत्यक्षात १६ एप्रिल १८५३ रोजी सुमारे साडे तीन वाजता अठरा डबे असलेली तीन इंजिनांची आगगाडी पाचशे प्रवासी घेऊन बोरीबंदरहून निघाली ती ५७ मिनिटांनी ठाण्यात पोहोचली. गाडीत गव्हर्नरबरोबर नाना शंकरशेट आणि काही मान्यवर मंडळी होती. बँण्डवादन झाल्यानंतर ही गाडी सुटली. या गाडीचा प्रवास पाहण्यासाठी त्यादिवशी बोरीबंदर ते ठाणे अशी दुतर्फा माणसं उभी होती.
मुंबई शहराची लोकसंख्या जसजशी वाढत गेली, तशी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था कमी पडू लागली. व्हिक्टोरिया अर्थात घोडागाड्या ती गरज भागवू शकत नव्हत्या. त्यामुळे मुंबईत ट्राम या संकल्पनेचा जन्म झाला. मुंबईत १८७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना झाली. ही ट्रामगाडी सुरुवातीला दोन मार्गांवर सुरू झाली. कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी ते बोरीबंदर आणि बोरीबंदर ते काळबादेवी-पायधुनी या मार्गावर ट्राम धावू लागल्या.
९ मे १८७४ चा तो दिवस.... त्यावेळी कुलाब्यापासून पायधुनीपर्यंतच्या प्रवासाला तीण आणे लागायचे. या ट्राममध्ये कंडक्टर असायचा पण तिकीटं नसायची... चार महिन्यांनंतर ट्रामच्या तिकिटांची कल्पना सुचली आणि ट्रामचं उत्पन्न वाढू लागलं. उत्पन्न वाढू लागल्यावर ट्रामचं तिकीट कमी करुन एक आणा करण्याचं औदार्य त्या काळच्या सरकारनं दाखवलं. ९ मे १८७४ म्हणजे ज्या दिवशी ट्राम सुरू झाली त्या पहिल्या दिवशी ४५१ प्रवाशांनी ट्राममधून प्रवास केला होता. आणि वसुली फक्त ८५ रुपये झाली होती.
एकतीस वर्षांनंतर शेवटच्या दिवशी जेव्हा साधी ट्राम बंद झाली त्यादिवशी ७१ हजार ९७४ प्रवाशांनी ट्राममधून प्रवास केला. ४२६० इतकं उत्पन्न त्यादिवशी जमा झालं. म्युझियम ते ससून डॉक, लालबाग, जेकब सर्कल, ऑपेरा हाऊस, करनॅक बंदर ते धोबी तलाव, जेजे हॉस्पिटल ते ग्रँट रोड या मार्गावर त्यावेळी ट्राम धावायची.... म्युझियमपासून दादरपर्यंतचा प्रवास त्याकाळी फक्त दीड आण्यात व्हायचा.
७ मे १९०७ ला वीजेवर चालणारी ट्रामगाडी सुरू झाली. त्यावेळी ट्रामगाड्यांमध्ये उभं राहण्याची व्यवस्था होती. आणि अप्पर क्लास आणि लोवर क्लास अशी विभागणी करण्यात आली होती. पण पहिल्याच दिवशी मालवणकर नावाचे प्रवासी ट्राममधून रुळांवर पडले आणि त्यांचा पाय तुटला. कालांतरानं ट्राममध्ये उभं राहायला म्युनिसिपाल्टीनं बंदी घातली आणि १९२० साली दुमजली ट्राम सुरू झाली. ट्रामच्या या नव्वद वर्षांच्या इतिहासात मुंबई झपाट्यानं बदलली.
मुंबईतल्या वाहनांची संख्या हाहा म्हणता वाढली. स्वाभाविकच ट्रॅफिक वाढला. मुंबईच्या गतीपुढे ट्रामच्या चाकांचा वेग कमी पडू लागला आणि अखेर ३१ मार्च १९६४ ला ट्राम बंद झाली. पण तब्बल ९० वर्षं जिव्हाळ्याची ठरलेल्या ट्रामला मुंबईकरांनी वाजत गाजत निरोप दिला. शेवटची ट्राम बोरीबंदरहून दादरला रात्री दहा वाजता निघाली.तिला निरोप द्यायला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामध्ये कंटक्टर होते बी. जी. घाटे. मुंबईकरांनी या कंडक्टरचे चक्क ऑटोग्राफ घेतले.... एखाद्या कंडक्टरला असा मान पहिल्यांदाच आणि कदाचित शेवटचाच मिळाला असावा.   
ट्राम बंद झाली आणि मुंबईकर हळहळला.... ती अकरा नंबरची ट्राम तरी ठेवायला हवी होती.... असं पुलं म्हणाले होते... खरंच..... ट्रामशी मुंबईकरांचं घट्ट नातं जोडलं गेलं होतं.... ट्रामच्या गतीनं धावणारी मुंबई आता मोनोबरोबर धावणार आहे.... तब्बल पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेरीस मुंबईकरांचं मोनोरेलचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आहे. १ फेब्रुवारी २०१४ रोजी मोनो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. तिला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा कंदील दाखवला. २ फेब्रुवारीपासून ही मोनो सकाळी सात ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरूवातीला सेवेत असणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यानूसार वडाळा ते चेंबूरचा मार्ग सुरू करण्यात येतोय.. यामुळे मुंबईकरांचा प्रवास थोडा स्वस्तात आणि दिलासादायक होणार आहे.
मुळातच वेगानं पळणा-या मुंबईचा वेग आणखी वाढवण्यासाठी मोनो रेल्वे सज्ज झालीय.  मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात वडाळा ते चेंबूर या ८.८ किल