औरंगाबादेत दुष्काळ... मराठी विद्यार्थ्यांचा

इंग्रजी शिक्षणाची ओढ वाढल्याचा थेट परिणाम मराठी शाळांवर होतोय. विद्यार्थी कमी असल्याचं कारण देत काही ठिकाणी मराठी तुकड्या बंदही केल्या जातात. मात्र औरंगाबादेत केवळ दोनच विद्यार्थ्यासाठी मराठी वर्गाची तुकडी सुरू आहे.

Updated: Jun 29, 2012, 06:15 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद

 

इंग्रजी शिक्षणाची ओढ वाढल्याचा थेट परिणाम मराठी शाळांवर होतोय. विद्यार्थी कमी असल्याचं कारण देत काही ठिकाणी मराठी तुकड्या बंदही केल्या जातात. मात्र औरंगाबादेत केवळ दोनच विद्यार्थ्यासाठी मराठी वर्गाची तुकडी सुरू आहे.

 

महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये श्रुती आणि योगेश हे दोन विद्यार्थी शिकत आहेत. या वर्गात दोनच विद्यार्थी शिक्षणाची बाराखडी गिरवतात. कारण ते मराठी माध्यमात शिकत आहेत. स्पर्धेच्या या युगात आपल्या पाल्यानं टिकाव धरावा म्हणून  इंग्रजी माध्यमात टाकण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे या मराठीच्या वर्गाला फक्त दोनच मुलं मिळाली. विद्यार्थी संख्या वाढली नाही तरी हा वर्ग सुरुच राहणार असल्याचा विश्वास संस्थाचालकांनी व्यक्त केला आहे.

 

आत्तापर्यंत अनेक शाळांनी मराठी शाळांच्या तुकड्या विद्यार्थ्यांअभावी बंद केल्या. मात्र माय मराठीच्या संवर्धनासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात टाकणं आणि त्याचबरोबर या शाळेनं मराठी माध्यमाची तुकडी सुरू ठेवणं निश्चितपणे स्तुत्यच म्हणावं लागेल.