‘पटकथा चांगली तर हिरोईनची गरज काय?’

‘पटकथा चांगली असेल तर हिरोईनची गरजचं काय?’... थांबा, थांबा... असं आम्ही म्हणत नाही तर असं म्हटलंय अभिनेता परेश रावल यांनी...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 23, 2012, 04:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘पटकथा चांगली असेल तर हिरोईनची गरजचं काय?’... थांबा, थांबा... असं आम्ही म्हणत नाही तर असं म्हटलंय अभिनेता परेश रावल यांनी...
परेश रावल यांच्या ‘ओह माय गॉड’ या नाटकाचं सिनेमामध्ये रुपांतर होतंय. या सिनेमामध्ये अभिनेत्री नाही. ‘हे चांगलंच आहे की यामध्ये कोणतीही अभिनेत्री नाही. या सिनेमात पूर्ण लक्ष कथेवर केंद्रीत केलं गेलंय. कथा उत्तम असेल तर त्यामध्ये हिरोईन असो वा नसो... त्याचा सिनेमावर काहीही परिणाम होत नाही. कथा अगदी उत्तम असल्यानं प्रेक्षक ही कथा सहजासहजी विसरू शकणार नाहीत. त्यामुळेच हा सिनेमा वेगळा आहे’ असं परेश रावल यांनी म्हटलंय.
‘ओह माय गॉड’चं समीक्षकांनी भरपूर कौतुक केलंय. ‘कांजी विरुद्ध कांजी’ या गुजराती नाटकाचं हे सिनेमातर रुपांतरण करण्यात आलंय. नाटकाचं सिनेमात रुपांतर करताना निर्मात्यांनी या कथेला आणखी उठावदार करण्यासाठी मूळ पटकथेत बरेच बदल केलेत. एका नास्तिक व्यक्तीच्या आयुष्याची कथा यात गुंफण्यात आलीय. त्याचं दुकान भूकंपात नष्ट होतं आणि त्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं. पुढं काय घडतं हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमाच पाहावा लागणार आहे.