कान्समध्ये मल्लिकाने भारताची इज्जत टांगली वेशीवर

कान्स फेस्टिव्हलमध्ये विशेष कार्यक्रमात मल्लिकाने भारताची इज्जत वेशीवर टांगली. भारतीय लोक अत्यंत ढोंगी आणि प्रतिगामी असल्याची टीका मल्लिका शेरावतने कान्स फेस्टिव्हलमध्ये केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 28, 2013, 05:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कान्स
मल्लिका शेरावतने आपल्या बोल्डनेसच्या जोरावर बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही काही सिनेमे मिळवले. पण, आता कान्स फेस्टिवलव्यतिरिक्त तिची कुठेच दखल घेतली जात नसल्यामुळे आता मल्लिकाने पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करायला सुरूवात केली आहे.
कान्स फेस्टिव्हलमध्ये विशेष कार्यक्रमात मल्लिकाने भारताची इज्जत वेशीवर टांगली. भारतीय लोक अत्यंत ढोंगी आणि प्रतिगामी असल्याची टीका मल्लिका शेरावतने कान्स फेस्टिव्हलमध्ये केली. भारत हा देश महिलांसाठी अजिबात सुरक्षित नसल्याचं मल्लिका शेरावतने यावेळी म्हटलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर असे उद्गार काढून मल्लिकाने भारताचं नाव जागतिक स्तरावर बदनाम केल्याची टीका मल्लिकावर होत आहे. “मला भारतात राहायला फारसं आवडत नाही. म्हणून मी अर्ध्याहून अधिक काळ लॉस अँजेलिसला असते. तिथे मी स्वातंत्र्य उपभोगते. भारताला स्त्रियांची प्रगती नको आहे. स्वतंत्र विचारांच्या महिलांसाठी भारत देश योग्य नाही” असं मल्लिका शेरावत या समारंभात म्हणाली.
मल्लिका शेरावत यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं करून चर्चेत राहिली आहे. गेले काही महिने तिचे बॉलिवूडमध्ये सिनेमे हिट होत नाहीत. त्यामुळे चर्चेत राहाण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा मार्ग मल्लिकाने पुन्हा अवलंबला. मात्र जागतिक स्तरावरील समारंभात भारताबद्दल असं विधान करून मल्लिकाने भारतीयांची नाराजीच ओढावून घेतली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.