अवघ्या एका महिन्याच्या चिमुरडीला जिवंत जाळलं!

अवघ्या एका महिन्याच्या तान्हुलीस जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादजवळच्या वाळूज भागातल्या शिवराई परिसरात घडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 8, 2013, 01:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
अवघ्या एका महिन्याच्या तान्हुलीस जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादजवळच्या वाळूंज भागातल्या शिवराई परिसरात घडलीय.

घरी सगळे मंडळी झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीनं पहाटेच्या सुमारास या मुलीला पळवलं आणि दुपारी हाती लागला... तो या मुलीचा मृतदेह... तोही अर्धवट जळालेल्या अवस्थेत. हादरवून टाकणाऱ्या या घटनेमुळं परिसरात प्रचंड दहशत निर्माण झालीय. महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीनं चिमुकलीचा मृतदेह सापडण्याची ही या भागातली दुसरी घटना आहे.
शिवराई भागातल्या कर्जुले दाम्पत्याची ही चिमुरडी होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास आपल्या अवघ्या एका महिन्याच्या मुलीला घरातल्या पलंगाला बांधलेल्या झोळीत झोपवून मुलीची आई बाहेर गेली... थोड्या वेळानं ती महिला घरी आली असता झोळीतून मुलगी गायब झाली होती. याबाबत सुरुवातीला कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतरही ती सापडली नाही तेव्हा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान दुपारी कर्जुले यांच्या घराच्या मागे १०० फूट अंतरावर झाडाझुडपात या मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडलाय.
मृतदेहाजवळ रॉकेलचा वास येत असलेली बाटली, जळालेला रुमाल आणि जाळण्यात आल्याच्या खुणा आढळून आल्यात. त्यामुळे चिमुकलीला जिवंत जाळून झुडूपात फेकण्यात आल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.

गेल्या महिन्यात सुलतानपूर भागात अवघ्या १२ दिवसांची तान्हुली अशीच गायब झाली होती. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह जवळच्या एका विहिरीत सापडला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.