अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 20, 2014, 03:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद/बीड/जालना/कोल्हापूर
सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.
बीड,हिंगोली, औरंगाबाद जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. फुलंब्री, गाढे जळगाव, वडोदबाजार आणि लाडसावंगीत गारपीट झाली. फुलंब्री तालुक्यात डोंगरगाव कवाड इथं गारपिटीत ३५० कोंबड्यांचा मृत्यू झाला. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी दुपारी गारांच्या तडाख्यासह अवकाळी पावसानं झोडपलं. कोल्हापूर आणि सातार्‍यात पावसानं तीन बळी घेतले आहेत.
कोल्हापूरच्या कळंकवाडी इथं वीज पडून महिलेचा, तर गारपिटीमुळं म्हालसवडेमध्ये वृद्धाचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात नांदगावमध्ये वीज कोसळल्यानं ऊसतोडणी महिलेचा मृत्यू झाला आहे. करवीर तालुक्यातील शिय इथं ओढय़ाचं पाणी अचानक वाढल्यानं ३५ बकर्‍यांचा कळप वाहून गेला. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार इथल्या मोकळ्या जागेत पाल ठोकून राहत असलेल्या तालुक्यातील अंजनवाडा इथल्या शंकर तातेराव शिंदे यांच्यावर अंगावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्याला शनिवारी वादळी पावसानं झोडपलं. अक्कलकोट तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यातील १८ गावांतील ६५ वीजेचे खांब पडले. यामुळं कालपासून अद्याप या गावात अंधार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.