मुंबईमधल्या लहान मुलांमध्ये अशक्तपणाचं प्रमाण वाढलं

लहान मुलांचं आरोग्य धोक्यात

Updated: Feb 5, 2019, 07:09 PM IST
मुंबईमधल्या लहान मुलांमध्ये अशक्तपणाचं प्रमाण वाढलं title=

सुस्मिता भदाणे, मुंबई : मुलं नीट खातंच नाहीत, भाज्या तर मुळीच खात नाहीत. मॅगी आणि चिप्स खायला पटापट तोंड उघडतात, पण भाज्या नको. ही बहुतांश घरांमधली तक्रार असते. लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या या बिघडलेल्या तंत्रामुळे काय घडतं आहे. याची माहिती देखील अनेक पालकांना नसेल.

तुमचं मूल सतत आजारी पडतं का?, तुमची मुलं पोषक आहार खातात का?, तुम्ही घरात अन्न शिजवताना लोखंडी भांड्याऐवजी निरलेपची भांडी वापरतात का? तुमच्या मुलांना तुम्ही हिरवा भाज्यांऐवजी बर्गर पिझ्झा खाऊ घालता का? या प्रश्नांची उत्तर जर हो असेल तर तुमच्य़ा मुलांचं आरोग्य धोक्यात आहे. हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मुंबईमधल्या लहान मुलांमध्ये अॅनिमिया अर्थात अशक्तपणाचं प्रमाण वाढलं आहे.

मुंबईत ४१% टक्के मुलांना, पुण्यात १४% मुलांना अॅनिमिया असल्याचं समोर आलं आहे. ७,००८ मुलांमागे २,९१४ मुलांना तर ५,७३४ पैकी २,२८८ मुलींच्या रक्तात लोहाचं प्रमाण कमी आढळलं आहे.

शहरी भागातली जीवनपद्धती आणि आहाराची चुकीची पद्धत यामुळे हे प्रमाण वाढल्याचं सांगण्यात येतं आहे. जंकफुडच्या नादी लागून मुलांना सुदृढ होण्यापासून आपण रोखत तर नाही ना, याचा विचार पालकांनी ताबडतोब करणं गरजेचं आहे.